पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळातून नाराळ देण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे यांचा समावेश आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली होती. त्याला आज विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाली आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. पटोलेंच्या या टीकेला आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिटोला लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते.
नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्दल होत का ? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही आहे.
यावेळी फडणवीसांनी १२ आमदारांच्या निलंबनावर कडाडून टीका केली.लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम राज्यातील महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.