मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरोगी व आरोग्यदायी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे महाविकास आघाडी सरकारने वाटचाल सुरू केली असून त्याअंतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम’ जाहीर करण्यात आला आहे. यातून हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रात 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यात तब्बल वीस हजार होतकरू युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. इच्छुक युवक http://www.mahaswayam.gov.in महास्वयम या राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करू शकणार आहेत.
या अभ्यासक्रमांद्वारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. कोरोना काळात वैद्यकीय सेवा वाढविल्या आहेत, त्या हाताळण्यासाठी लागणारे सक्षम मनुष्यबळ या उपक्रमातून तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सदैव जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेत आहे. या योजनेसाठी साधारणतः 40 कोटींचा खर्च अपेक्षित असून 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या युगात कौशल्य असलेला युवक कधीही उपाशी राहत नाही. त्यामुळे कौशल्य विकास विभागाच्या या कार्यक्रमाची बेरोजगारी निर्मूलनातली भूमिकाही महत्त्वाची ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाकडून जून 2021 मध्ये 15 हजार 366 रोजगार उपलब्ध झाले आहेत. केवळ प्रशिक्षणच नाही तर रोजगार देण्यासाठीदेखील विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत असे नवाब मलिक यांनी सांगितले.
तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला आरोग्य विभागाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासित करतानाच राज्याच्या वैद्यकीय सेवांसाठी चांगले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.