मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर कारवाई केली असून 152 कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत भूखंड, बंगला, रहिवाशी संकुलाचा समावेश आहे. ही कारवाई गुरुवारी (12 ऑक्टोबर) करण्यात आली. याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने माहिती दिली आहे.
विवेकानंद पाटील चार वेळा आमदार राहिलेले आहेत. ते कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. दरम्यान याच बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडून त्यांच्या 152 कोटींच्या मालेमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
तसेच या मालमत्तेमध्ये विवेकानंद पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा देखील समावेश करण्यत आला आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात एकूण 386 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ED has provisionally attached immovable properties belonging to Vivekanad Shankar Patil, a four-time MLA from Shetkari Kamgar Paksha Party and Ex- Chairman of Karnala Nagari Sahakari Bank Ltd, Panvel, his relatives and Karnala Mahila Readymade Garments Cooperative Society… pic.twitter.com/4gdqRTkZCw
— ED (@dir_ed) October 12, 2023
कर्नाळा बँकेत 512 कोटी रूपयांचा घोटाळ्याची माहिती समोर आली. या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील हे मुख्य आरोपी असल्याची समोर आली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी 17 संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान तत्कालीन गृहखाते हे या प्रकरणाची चौकशी करण्यात चालढकलपणा करत असल्याचा आरोप देखील भाजप आमदारांकडून करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडे मार्च 2020 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने याप्रकरणी तपसा सुरु केला. चौकशी अंती अखेर 12 ऑगस्ट 2021 रोजी विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांची 234 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
बॅंक घोटाळ्याचा भाजप नेत्याने केला होता आरोप –
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तर माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी हा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बॅंकेने या बँकेचे ऑडिट केले त्यावेळी कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले.
दरम्यान मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेनामी खातेदारकांच्या नावाने खाते उघडण्यात येत होते. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची कर्जरुपी रक्कम जमा केली जात होती. हीच रक्कम आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये विवेक पाटील यांनी वळवल्याचा आरोप भाजपने केला होता.