इंदापूर तालुक्यात 2 हजारांवर तरूणांना मिळणार रोजगार : सरपंच, ग्रामसेवकांना कामगार नियुक्तीचा अधिकार
पळसदेव – राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत इंदापूर तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने 4 लाख 7 हजार आठशे झाडांची लागवड होणार आहे. त्याचबरोबर वृक्षारोपणानंतर आता राज्य शासनाकडून वृक्षसंवर्धनासाठी कामगारांची नियुक्ती होणार आहे.
यासाठी इंदापूर तालुक्यात 2 हजार 390 कामगारांची नियुक्ती करण्याचा अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना मिळणार आहे. त्यामुळे बेरोजगारांनी संवर्धनातून रोजगारवाटा उपलब्ध होणार आहेत. मात्र, याची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यानंतर खऱ्या अर्थाने संवर्धन सार्थकी लागणार आहे.
राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत इंदापूर तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने 4 लाख 7 हजार आठशे झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे इंदापूर तालुक्यातील 142 गावे व वाड्या वस्त्या मिळून गायरान क्षेत्र अधिक असलेल्या गावात अधिक झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. इंदापूर तालुक्यातील गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. सध्या ज्या क्षेत्रावर अतिक्रमण नाही.
त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे उरलेल्या जागेवर होणारे अतिक्रमण देखील थांबवण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना फळ झाडाचे वाटप करून त्यांच्यामार्फत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी चिंच, सीताफळ, जांभूळ आदी फळ झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. गायरान भागात कडुलिंब,रेनट्री, बांबू, वड, काशीद आदी रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
हलगर्जीपणा केल्यास कारवाई
लागवड करण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांनी या झाडाचे जतन व संवर्धन करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीस 14 व्या वित्त आयोगात निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दुर्देवाने अनेक ग्रामपंचायती या निधीचा वापर करत नाहीत. त्यामुळे दरवर्षी लावलेली झाडे थोड्या दिवसातच जळून गेलेले चित्र पाहावयास मिळत आहे. काही सरपंच आलेली रोपाची लागवड देखील करीत नाहीत. यावेळी वृक्षारोपण व संवर्धनामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
चार लाख रोपांचे वाटप
सरपंच व ग्रामसेवक यांनी वृक्ष संवर्धनाबाबत दक्षता घेतल्यास 33 कोटी लागवड कार्यक्रम यशस्वी होईल. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वृक्ष लागवड व्याहाळी गावात 14 हजार 750 करण्यात येणार आहे. अवसरी 14 हजार 350, पळसदेव 8 हजार 760, भांडगाव 8 हजार 200, खोरोची 6 हजार 610, निमगाव केतकी 6 हजार 160, निरवांगी 9 हजार 420, बावडा 3 हजार 600, पिंपळे 13 हजार असे एकूण 4 लाख सात हजार 800 रोपांची लागवड इंदापूर तालुक्यात होणार आहे. या रोपांचे संवर्धन करण्यासाठी तालुक्यात 2 हजार 390 कामगारांची नियुक्ती करण्याचा अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना मिळणार आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील 2 हजार 390 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. सोमवार दि. 15 पासून गावनिहाय रोपांचे वाटप होणार आहे.
देशाच्या सरक्षंण विभागासाठी वालचंदनगर कंपनीने वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेकदा योगदान दिले आहे. चांद्रयान-2 मध्ये कंपनीने तयार केलेले बुस्टर बसवण्यात आले आहेत. या मोहिमेत कंपनीचा सहभाग असल्याने यांचा वालचंदनगर कंपनी व महाराष्ट्रासाठी अभिमान आणि गौरव आहे.
– जी के पिल्लई, व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर इंडस्ट्रीज.