जनजागृती आवश्यक, नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे ः कचरा परिषदेत तज्ज्ञांचे मत
पुणे – शहराची कचरा समस्या, संभाव्य उपाय, नागरिकांचा सहभाग, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे प्रयोग याचा उहापोह करण्यासाठी शिवप्रजाराज्यम संघटना, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया आणि माय अर्थ फाउंडेशन यांच्या वतीन शनिवारी “कचरा परिषदे’चे आयोजन केले होते.
या परिषदेमध्ये महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, प्लॅस्टिक विषयावर काम करणारे सचिन निवंगुणे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, पुणे महानगर परिषदेचे ऍड. गणेश सातपुते, कचरा समस्या विषयावर काम करणारे ललीत राठी, इसीआयचे नीलेश इनामदार, ग्राहक पंचायतीचे विलास लेले, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आपली मते मांडली.
वीस वर्षांपासून कचऱ्यात प्लॅस्टिक आल्याने शेतकऱ्यांनी कचरा घेणे बंद केल्याने शहरात कचरा साचू लागला. त्याचे विघटन करणे गरजेचे आहे. वर्गीकरण केले तर कचऱ्याची समस्या सुटू शकते. नागरिकांनी स्वत: जागृतीमध्ये सामील व्हावे, असे निवंगुणे म्हणाले.
सामाजिक प्रश्नांमध्ये नवी पिढी जेव्हा सामिल होईल, तेव्हा त्याचे निराकरण होण्यास वेळ लागणार नाही. हव्यासापोटी आपण आज पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत, असे मत धारिया यांनी मांडले. कचरा वेचकांना सॅनिटरी नॅपकिनची मोठी समस्या आहे. या कचऱ्याचे जागेवरच निर्मूलन होणे गरजेचे आहे, असे राठी म्हणाले.
नागरिकांची मानसिकता बदलली तर आपला परिसरही परदेशातील वसाहतींसारखा होऊ शकतो. मिशन-2020 आणि उद्दिष्ट शून्य ते शंभर ठेवण्यात आले आहे. शहरात 1809 कंटेनर होते ते कमी करून 200 राहिले आहे. कायद्याने नागरिकांना जी जबाबदारी दिली आहे, ती ते पार पाडणार आहेत की नाही, हे महत्त्वाचे आहे. ओला-सुका कचरा वेगळा देणे गरजेचे आहे. दंडात्मक कारवाईनंतर नागरिक स्वत:मध्ये बदल करत असल्याचे आणि त्यांच्यात जागृती होत असल्याचे चित्र दिसत आहे. नियम पाळले, तर 40 टक्के समस्या कमी होते .
– ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, मनपा.