नवी दिल्ली – खेळते भांडवल नसल्यामुळे त्रस्त झालेल्या जेट एअरवेजची केवळ अर्धा डझन विमाने सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे या विमान कंपनीला तातडीने दीड हजार कोटी रुपये स्टेट बॅंकेने उपलब्ध करावेत, असा आग्रह या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
त्याचबरोबर पंतप्रधानांनी या प्रकरणात थेट लक्ष घालावे आणि वीस हजार रोजगार वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आंदोलन सुरू केले होते मात्र, ते काही काळाने परत घेतले आहे. कंपनीने विमानाचे भाडे न दिल्यामुळे 123 पैकी केवळ सहा ते आठ विमाने सध्या कार्यरत आहेत.
त्याचबरोबर या विमानांचा अनेक वेळा तेल कंपन्यांनी इंधन पुरवठा बंद केलेला आहे. तर दुसरीकडे स्टेट बॅंक या कंपनीचे भागभांडवल नव्या गुंतवणूकदारांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रक्रियेला बराच वेळ लागत असल्यामुळे जेट रेल्वेच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.
सरकारने गेल्या आठवड्यात या बाबीची गंभीर दखल घेतली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे विमान कंपनी बंद पडते की काय अशा शंका निर्माण होऊ लागली आहे. तसे झाले तर एकूणच नागरी विमान वाहतूक क्षेत्रावर बराच परिणाम होणार आहे.त्याचबरोबर सध्या विमान कंपन्यांचे दर वाढलेले आहेत आणि आगामी काही काळ तरी त्यात कपात होण्याची शक्यता नाही. विमानांची संख्या 20 पेक्षा कमी झाल्यामुळे या आठवड्यात जेटला आंतरराष्ट्रीय सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत.