मानसिक स्वास्थ बिघडले: कौटूंबिक वातावरण बिघडले
कात्रज – पीएमपीएलच्या चालक-वाहकांना रोज दिलेल्या चार हजाराच्या टार्गेटचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक चालक व वाहकांमध्ये शाररीक व मानसिक ताण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुट्यांवर जाण्याचे प्रमाण ही वाढले आहे.या ताणातून कसे बाहेर पडायचे याचीच चिंता आता सर्व चालक व वाहकांना लागली आहे.
पीएमपीएलने बस डेपो मधील सर्व बस चालक व वाहक यांना रोज किमान चार हजार रुपये व्यवसाय करून द्या, नाहीतर घरी जा. असा धमकीवजा आदेश काढण्यात आलेला आहे.त्याचबरोबर ज्यांचा व्यवसाय चार हजार होणार नाही त्यांनी स्वत;च्या खिशातून पैसे भरायचे आहेत.असे ही त्यात म्हटले आहे.गेले काही दिवसांपासून हा आदेश लागू झाला आहे.सुरवातीला या आदेशाचे फार काही वाटले नाही पण आता मात्र त्यांचा परिणाम चालक व वाहकांच्या शरीरावर व मानसिकतेवर दिसून यायला लागला आहे.प्रत्येक चालक-वाहक सध्या मानसिक तणावात काम करताना दिसत आहे.त्यातून शाररीक व मानसिक थकव्याचे बळी ठरु लागले आहे.अनेकांचे तर कौटूबिक स्वास्थ बिघडले आहे.
काही करा पण चार हजार रुपयांचा व्यवसाय करा असा आदेश हा चुकीचा आहे.याबाबत काही चालक व वाहकांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या, जर कमी व्यवसाय झाला तर खिशातून पैसे भरावे लागतात हे पैसे भरले नाही तर नोटिस दिली जाते किंवा बदली करण्याची धमकी दिली जाते.पीएमपीएलएम मध्ये असणाऱ्या गैर कारभाराचा फटका मात्र चालक व वाहकांना बसत आहे.प्रत्येक मार्गावरील बसचा दिवसभराचा व्यवसाय साधारणत: तीन ते साडे तीन हजार रुपये होतो.रोज चार हजार होतोच असे नाही.याशिवाय बस मध्ये निरनिराळ्या पासधारकांची संख्या सुद्धा अधिक असते.त्यांनी थेट पैसे पीएमपीएमएल कडे भरलेले असतात.त्यांचे काय करायचे असा ही सवाल काही जणांनी व्यक्त केला आहे.
या टार्गेट पायी वाहकांमधील चिडचिडेपणा वाढला आहे.प्रवाशांबरोबर सुद्धा अनेक वेळा भांडणे होताना दिसत आहे.कौटूबिंक स्वस्थ सुद्धा हरविल्या सारखे झाले आहे.आर्थिक भुर्दड बसतो तो वेगळाच त्यामुळे आर्थिक चणचण सुद्धा वाढली आहे.याचा परिणाम हा घरावर होऊ लागला आहे.भांडणे होत आहेत. या आजारामुळे अचानक सुट्टीवर जाणाऱ्या चालक व वाहकांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. यातून मार्ग काढण्यासाठी ही टारगेट पद्धत सर्वप्रथम बंद करावी अशी मागणी आता कामगारा वर्गातून जोर धरु लागली आहे.