सातारा – लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोनाचे संक्रमण वाढत आहे. करोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केला. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी भर देण्याची सूचनाही त्यांनी केली.
करोना संसर्गाच्या अनुषंगाने उदभवलली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषदेत गृहमंत्री देशमुख बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत. संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाब दक्षता घ्यावी.
फलटण आणि जावळी तालुक्यातील संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बाधितांमध्ये 61 टक्के पुरुष व 39 टक्के महिला आहेत. आजपर्यंत एक हजार 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात 21 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण आहे. जिल्ह्यात 308 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
गंभीर करोनाबाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार आहे, अशी माहिती देऊन देशमुख म्हणाले, “”करोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षावरील 12 हजार कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. 50 ते 55 वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधे काम दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी संकुलासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या नऊ पालख्या 30 जूनला पंढरपुरात पोहचतील. 2 जुलै रोजी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भेटीचा कार्यक्रम होईल. 18 ते 20 वारकरी पादुका घेऊन जातील, याचेही नियोजन झाले आहे. ” बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी करोनासंदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, उपस्थित आमदारांनीही वेगवेगळ्या सूचना केल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाचे गृहमंत्र्याकडून कौतूक
करोनाच्या अनुषंगाने जिल्हा दौर्यावर आलेल्या गृहमंत्र्यांनी आढावा घेत, जिल्हा पोलीस दल, महसूल, आरोग्य या विभागांचे कौतूक केले. मात्र, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर तातडीने चौकशीचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनां दिले.