कोलंबो :- एसीसी इमर्जिंग आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तानने परंपरागत प्रतिस्पर्धी भारतीय संघाचा 128 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत या दोन्ही संघातील अंतिम सामना तसा एकतर्फी झाला.
भारताचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजी दिली. त्यांच्या तय्यब ताहिरने 108 धावांची अफलातून खेळी केली. त्याला साहीबजादा फरगानने 65, सइम आयुबने 59, ओमर युसुफ व मुबासिर खान यांनी प्रत्येकी 35 धावांची खेळी करत सुरेख साथ केली. यांच्या जोरावर पाकिस्तानने भारतासमोर 352 धावांचा डोंगर उभारला.
विजयासाठी 353 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 40 षटकांत 224 धावांवरच आटोपला. भारताकडून अभिषेक शर्माने 61, कर्णधार धुलने 39 तर साई सुदर्शनने 29 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
पाकिस्तानकडून सुफियान मुकीमने 3 गडी बाद केले. महंमद वासिम, मेहरान मुमताज व अर्शद इक्बाल यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.