सातारा – गुटखा विक्रीप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी पान टपऱ्यांवर जोरदार कारवाई केली आणि सुमारे 23 टपरी चालकांना अटक केल्याचे वृत्त समजले. परंतु त्याचबरोबरीने कोयता गॅंग, बकासूर गॅंग, अमका फाळकुट दादा इत्यादींच्या कोयते, तलवारी, देशी-विदेशी घोडयांमधून फायरींग या प्रकारांवरुन समाजात दहशत पसरवणाऱ्यांना जिल्हा आणि पोलीस प्रशासन कधी पत्र्या ठोकणार? असा सवाल जनतेतून होत आहे. परिणामी दहशत फैलावणाऱ्यांचा पुर्ण बंदोबस्त करावा, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या पत्रकात खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे, की गुटखा हा प्रकार निश्चितच वाईट आहे. गुटखा विक्रीवर राज्यात बंदी आहेच. गुटखा किंवा अन्य कोणत्याही व्यसनाचे आणि व्यसनांधांचे आम्हीच काय कोणीच समर्थन करणार नाही. तथापी गुटखा खाल्ल्याने किंवा विक्री केल्याने समाजामध्ये दहशत निर्माण होत नाही हे ही तितकेच खरे आहे. शासनही गुटखा किंवा प्लॅस्टिक विक्रीवर बंदी आणते. परंतु त्याच्या उत्पादनावर का बंदी आणत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तंबाखू खाणे दंडनीय अपराध ठरतो तर तंबाखू विक्री आणि उत्पादन किंवा बाळगणे सुध्दा अपराध ठरला पाहिजे. पण, तसे होत नाही. तेव्हा प्रशासनाने टपरीचालकांना जेथून माल येतो अशा व्यापाऱ्यांना पकडले पाहिजे. पोलिसांची दादागिरी, वचक दहशत माजवणाऱ्यांवर असली पाहिजे. परंतु ती गोरगरीबांवर असल्याचे या घटनांमधून ठळक होत आहे.
समाजात दिवसाढवळया, रात्री-अपरात्री दहशत पसरवणाऱ्यांचा आणि त्यांच्या सुत्रधारांचा बंदोबस्त प्रथम केला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, समाजातील कोणालाही कधीही रस्त्याने जाता- येता यावे, अशा प्रकारची सुरक्षा पुरवली पाहिजे. मग छोटया व्यावसायिकांवर कायद्याने कारवाई करावी. कारवाईमध्ये त्याचे काही क्रम असावेत, हे जनतेचे म्हणणे काही चुकीचे नाही.
संगमनगर, कृष्णानगर, (शहर पोलीस स्टेशनच्या हददीचा भाग) शाहुपूरी, राजवाडा, मल्हारपेठ, बुधवार नाका, मोतीचौक, बोगदा या भागात अनेकवेळा एकटया दुकटयाला अडवून, वाटमारी-जबरी चोरी झाली आहे. रस्त्यावर धारदार शस्त्रे नाचवली गेली आहेत. गोळीबार देखील झाला आहे. अशा अनपेक्षित प्रकारांमुळे नागरिकांत अनामिक भीती निर्माण होत असते. त्यामुळे समाजविघातक प्रकार करणाऱ्यांना पोलिसांनी वेळीच पत्र्या ठोकल्या पाहिजेत. पोलिसांचे खबरे कार्यरत नाहीत काय? नसतील तर नव्याने खबरे तयार करावेत. लोकांमधुन पोलीस मित्र, पोलीस ताई यासारखे उपक्रम राबवावेत.
तरुणांना रोजगार नाहीत, नोकऱ्या नाहीत. त्यामुळे एखाद्या कुटुंबातील कर्ता-धर्ता पान टपरी, हातगाडी, ढकलगाडी इत्यादीवर छोटा मोठा व्यवसाय करुन गुजराण करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत 23 टपरी चालकांवर कारवाई आणि त्यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा लावणे कितपत योग्य आहे याचा विचार पोलिस प्रशासनाने टपरी चालकांच्या भुमिकेत शिरुन केला पाहीजे.द हशतखोरांचा बंदोबस्त झाल्यावर, गुटखा किंवा तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याच्या उपक्रमाला अधिक चांगला अर्थ मिळेल, असेही पत्रकात म्हटले आहे.
समीर शेख संयमी
विद्यमान पोलिस अधिक्षक अत्यंत संयमी आहेत. त्यांनी कोठेही आजपर्यंत भडक भुमिका घेतलेली नाही. ते चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन हाताळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील दादागिरी, गुंडगिरी, भाईगिरी संपुष्टात आणण्याचे आव्हान यशस्वी करावे. आवश्यकता वाटेल तेथे जनतेमधील खबरे घेवून, दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांचा मुळासकट नायनाट करुन, बिमोड करावा अशी रास्त अपेक्षा भयभीत झालेल्या जनतेमधून व्यक्त होत आहे.