नगर – आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने जादा बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नगर विभागाच्या वतीने 385 जादा बस पंढरपूरच्या दिशेने धावणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस भाविकांना लागते. त्यामुळे गावा-गावातूने वारकऱ्यांचे दिंड्या निघतात. तर बहुतांश भक्त बसणे पंढरपूरला जाणे पसंत करतात. या भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस सोडतात.
नगर विभागाने जिल्ह्यातील 235 बसचे नियोजन केले आहे. याशिवाय धुळे विभागाकडून 75 आणि जळगाव विभागाकडून 75 बस मागविले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातून 150 बस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नगर विभागाच्या वतीने एकूण 385 बस ची व्यवस्था केली आहे. 75 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना एसटीचा प्रवास मोफत करण्यात आलेला आहे. याशिवाय महिला वर्गाला सरसकट पन्नास टक्के प्रवासात सवलत दिली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या वारीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
नगर होऊन 25 जून पासून जादा बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार आहेत. मात्र, भाविकांची मागणी आणि गर्दी वाढल्यास 20 जून पासून देखील जादा बसेस सोडल्या जातील असे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे यांनी सांगितले. पंढरपूर वारीसाठी आरक्षणाची देखील सोय करण्यात आली आहे.
तर गावातूनच बसची व्यवस्था
एखाद्या गावातून 40 वा त्यापेक्षा जादा भाविक ग्रुपने पंढरीच्या वारी करण्यास इच्छुक असल्यास महामंडळाची बस थेट गावात येण्यास तयार आहे.त्यामुळे संबंधित गावातील भाविकांनी लवकरात लवकर जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर विभागाने केले आहे.