पुणे – राज्यातील 1 हजार 498 कनिष्ठ महाविद्यालयात 3 लाख 72 हजार 53 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून अद्याप 1 लाख 63 हजार 417 प्रवेशाच्या जागा रिक्तच राहिले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेशाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे.
अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करण्यात आला होता. प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तीन फेऱ्या, समुपदेशनाची एक फेरी याप्रमाणे प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या. मागील वर्षात प्रवेशाच्या 5 लाख 59 हजार 344 जागा दर्शविण्यात आल्या होत्या. त्यात 3 लाख 78 हजार 861 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. तर 1 लाख 80 हजार 483 प्रवेशाच्या जागा रिक्तच राहिल्या होत्या. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा काही रिक्त जागांमध्ये घट झालेली आहे. राज्यात कॅपमधून सर्वाधिक 1 लाख 31 हजार 128, इनहाऊसमधील 16 हजार 847, अल्पसंख्याकमधील 14 हजार 887, व्यवस्थापन कोट्यातील 8 हजार 715 जागा रिक्तच राहिल्या आहेत.
पुण्यातील रिक्त जागांत वाढ
पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीत मागील वर्षात 1 लाख 7 हजार 215 प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. त्यातील 71 हजार 722 जागांवर प्रवेश निश्चित झाले होते तर 35 हजार 493 जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा 39 हजार 251 जागा रिक्त राहिल्या आहेत.