पुणे- टाटा जलविद्युत प्रकल्प समुहातून वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणारे भीमा खोऱ्याचे 42.50 टीएमसी पाणी टप्प्याटप्प्याने कमी करावे. त्यातील काही पाणी भीमा खोऱ्यात उपलब्ध करून देता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने सुर्वे समिती नेमली आहे. या समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार कार्यवाही होणार आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीचे खोऱ्यातील असून या खोऱ्यातील बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. तसेच वाढत्या शहरीकरण आणिऔद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करून ते पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्याकरिता करण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाने समिती नेमली आहे.
मुळशी येथील धरण ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आले आहे. आताची लोकसंख्या लक्षात घेता, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी पिण्यासाठी लागत आहे. मुळशी धरणातील पाण्यापासून वीजनिर्मिती केली जाते. मात्र, आता सौरऊर्जा, पवन ऊर्जा, औष्णिक ऊर्जा असे वीज तयारं करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
त्यामुळे मुळशी धरणातील पाण्यापासून वीजनिर्मितीच्या प्रमाणात कपात करून, ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी दिल्यास मोठा प्रश्न मिटणार आहे. याबाबत सुर्वे समितीचा अहवाल लवकर शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दुष्काळी भागासाठी पाणी देणार
टाटा जलविद्युत प्रकल्पांसाठी मागील 90 वर्षांपासून मुळशी, लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवाडी आणि ठोकरवाडी या धरणांमधून दरवर्षी 42.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येऊन वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी पुन्हा भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागांना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.