मुंबई- कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांना घरुन काम करावं लागत आहे आणि आता सगळ्या परिक्षासुद्धा ऑनलाईन होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे.
याच सगळ्या परिक्षा सुरळीत पार पडावी यासाठी, आयटी व इतर क्षेत्रात वर्क फ्रॉम होम कामासाठी वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीज यंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले.
दरम्यान, शालेय वर्ग, परीक्षा इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलं.
आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. दुरूस्तीचे काम आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे, असे आदेश देखील त्यांनी दिले.