सोरतापवाडी, (वार्ताहर)-थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 9 मार्चला होणार्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून गटा गटात बैठका सुरू आहेत. त्यामध्ये निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक जरूर घ्यावी; पण त्यामुळे कारखाना खरोखरच चालू होणार आहे का असा प्रश्न सभासद विचारत असुन त्याचे ठोस उत्तर कुणालाही देता येत नाही. अनेक सभासद कारखाना खरचं चालू होईल का, याकडे लक्ष वेधत असून, संचालक मंडळ स्थापन झाल्यानंतर कारखाना कसा सुरू होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.
अनेक शेतकर्यांचे म्हणने आहे की कारखाना सुरू होण्यासाठी कारखाण्याची काही जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. मग ही जमीन विकताना कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावी तसेच तेथे एक आधुनिक प्रकारचे मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. ही मागणी येणार्या नवीन संचालकांना विचार करायला लावणारी आहे.
हवेलीचे भाग्यविधाते माजी खासदार स्वर्गीय अण्णासाहेब मगर व त्यांच्या सहकार्यांनी 1968-1969 च्या कारखाना उभा केला. बागायती शेती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या परिसरात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. इतर सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत खर्च कमी असल्याने कारखाना उत्तम रीतीने चालू लागला.
पण नंतर आर्थिक अनियमिततेमुळे कारखान्याची आर्थिक घडी विस्कटू लागली व कारखाना सन 2011 मध्ये बंद पडला. आता हवेली तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणावर घटली असून मांजरी, कदमवाकवस्ती, फुरसूंगी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोली, आव्हाळवाडी, कुंजीरवाडी, केसनंद या गावामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. काही गावात तर ऊस खायलाही मिळत नाही, तर कारखान्याला ऊस मिळणार कोठून असा प्रश्न सभासद करत आहेत.
ऊस कुठून आणायचा?
कारखाना कार्यक्षेत्रातील गावे पुणे महानगरपालिके जवळ असल्याने त्या गावांचे झपाट्याने शहरीकरण झाले. त्यामुळे ऊस उपलब्ध होईल का या विषयी शंका येत आहे. कारखाना चालू झाला तर उसाची जबाबदारी कोण घेणार? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी ऊस जवळ असल्याने कारखान्याला परवडत होते; पण एवढा ऊस कुठून मिळणार, अशी शंका सभासदांना पडत आहे. निवडून आलेल्या संचालक मंडळाने जर एखाद्या मोठ्या बिल्डरला अगर संस्थेला जागा देण्यापेक्षा मार्केट कमिटीला जागा दिली तर हवेलीतील जागा हवेलीतच राहून त्या जागेचा कायापालट होऊ शकतो. असे मत अनेक सभासदांनी दिले.