सोरतापवाडी, (वार्ताहर)-थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून कारखाण्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू आहेत. पूर्व हवेली विचार मंचामध्ये कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एक चर्चासत्र ठेवले होते. त्यामध्ये तरुण पिढीने कारखाना बिनविरोध व्हावा, असा सूर लावला.
पूर्व हवेली विचारमंचची स्थापना सहा महिन्यांपूर्वी होऊन दर महिन्याला समाजातील विविध क्षेत्रातील जाणकारांचे मत जाणून घेतले जाते. तसेच सामाजिक समस्या, गोरगरिबांच्या समस्या, दवाखान्याविषयीचे प्रश्न, महसूल विषयी समस्या, शेती संदर्भातील समस्या, बँक प्रकरणाविषयी समस्या या सर्वांची चर्चा होऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो.
यावेळी सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माणिक गोते यांनी हवेली तालुक्याचे भाग्यविधाते माजी खासदार अण्णासाहेब मगर यांच्या विषयी व्याख्यान दिले व त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते कसे घडले, याविषयी माहिती दिली. तसेच कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातील चालू असलेल्या प्रक्रियेबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन पिढीचे मत आजमावून घेण्यात आले. त्यामध्ये कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, असे तरुण पिढीने सांगितले. सभासदांचे लक्षात घेता कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली तर कारखाना चालू होण्यास गती येईल.