मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. राज्यभरातील 288 मतदारसंघांपैकी केवळ 14 मतदारसंघांतून 14 उमेदवारांनी 15 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. उमेदवारांनी सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाचा धसकाच घेतल्याने उमेदवारांकडून नवरात्रीचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आज निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 288 मतदारसंघात 14 मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. एका उमेदवाराने दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने एकूण 15 अर्ज भरले गेले आहेत.
अर्ज भरण्यासाठी नवरात्रीचा मुहूर्त
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. येत्या शनिवार आणि रविवारी म्हणजे 28, 29 सप्टेंबरला तसेच 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज मिळणार नाहीत. तसेच स्वीकारण्यातही येणार नाहीत. 4 ऑक्टोबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. रविवारी नवरात्रीची घटस्थापना आहे. त्यामुळे नवरात्रीचा मुहूर्त साधत 30 सप्टेंबर ते 1, 3 व 4 ऑक्टोबर 2019 या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.