– एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवाव्या लागलेल्या उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पक्षाचे नाव ‘शिवसेना’ व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला याचा निर्वाळा दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे व समर्थकांच्या पारड्यात टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ हिंडे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ABP माझा या वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकशाहीत बहुमताच्या महत्व असते, आज सत्याचा विजय झाला. यापुढे देखील बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचारांच्या वाटेवर चालून त्यांची सेवा करू अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
एकीकडे शिंदे गटातील नेते या निकालावर समाधान व्यक्त करत असतानाच ठाकरे गटातील नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. उद्धव ठाकरे समर्थक संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा खोक्यांचा विजय असल्याचे म्हंटले. सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हंटले.