शिरूर -पुणे, चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहत येथून पायी चालत आलेले मध्यप्रदेशातील, उत्तर प्रदेश, बिहार येथील कामगारांना शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांच्या प्रयत्नाने 8 एसटी बसेसमधून प्रत्येकी 22 त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडवण्यासाठी रवाना करण्यात आले.
बसस्थानकाचे प्रमुख महेंद्र माघाडे, शिरूर ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने आदींचे याकामी सहकार्य लाभले. जेवढे लोक आज आम्हाला मिळून येतील, त्या सर्वांना पाठवण्याची जबाबदारी आता माझी राहणार आहे. त्यांना त्यांच्या घराची ओढ आहे. त्यांना इथून गाडी मिळाली त्यांना त्याचे कुटुंबीयांशी लवकर भेट होईल.
त्याच्याकडून यापेक्षा दुसरा आशीर्वाद आम्हाला काय मिळणार, पहाटे पाच वाजले तरी चालेल जास्तीत जास्त परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवणार असा दृढनिश्चय संतोषकुमार देशमुख यांनी बोलून दाखवला. शासनाने पायी चालणाऱ्या या परप्रांतीयांना एसटी बसची व्यवस्था करून त्यांच्या राज्याचे सीमेपर्यंत सोडवण्याची जबाबदारी सर्व तहसील कार्यालयांना दिली आहे.
या आदेशाची प्रमाणे लगेच या नागरिकांना गोळा करून त्यांना विश्वास देऊन त्यांची तपासणी करून येथून जेवणाचे पाकीट घेऊन त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठवले. आतापर्यंत आठ बसेस संध्याकाळपर्यंत जातील त्यानंतर जेवढ्या बसेस लागतील तेवढ्या आम्ही सोडणार असल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.