नगर – अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली आहे. दोन अहवालात एकूण आठ जण दोषी आढळलेले आहेत. तिसऱ्या अहवालामध्ये कोण-कोण दोषी आहे, याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र हा तिसरा अहवाल दप्तराच्या फेऱ्यात अडकल्याने तो रखडला आहे. अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते.
गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेने तीन पथके नेमली. पहिल्या पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात तीन ग्रामसेवक दोषी आढळून आले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दुसऱ्या चौकशी अहवालात प्रथमदर्शनी एकूण पाच अधिकारी दोषी आढळून आलेले असले तरी त्यांच्यावर प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. पहिला व दुसरा अहवाल तयार होऊनही तिसरा अहवाल तयार होत नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
अनेकांनी या अहवालाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून त्यात नेमके कोण दोषी आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अहवाल सुरु असल्याचे प्रशासनाकडून उत्तर मिळत होते. मात्र हा तिसरा अहवाल कोतूळ व आणखी एका ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशी आहे. मात्र या ग्रामपंचायतीचे दप्तर गायब असल्याने चौकशी समितीच्या हाती काय लागले याचा स्पष्ट उलगडा होत नाही.
दप्तर गायब असल्याने संबंधित ग्रामसेवकावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अहवालात आता काय उल्लेख करायचा असा प्रश्न या समितीला पडलेला असल्यानेच हाच अहवाल रखडलेला आहे. चौकट कारवाईतून कोणालाही वगळू नका तीन पैकी दोन चौकशी समित्यांचे अहवाल तयार असून त्यातील एका चौकशीतील तीन जणांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे इतर दोन्ही चौकशी अहवालातून कोणालाही वगळू नये, व कोणालाही त्यातून सूट प्रशासनाने देऊ नये, अशी मागणी जोर धरत आहेत.