सृजनशील मराठी साहित्यिक, सुबोध ज्ञानेश्वरीचे लेखक, पटकथा लेखक, प्रकाशक, य. गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) यांचा आज जन्मदिन.
गुहाघर तालुक्यातील भातगाव हे जोशींचे मूळ गाव. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे 17 डिसेंबर 1901 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक समस्येमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांना शिक्षण सोडावे लागले. चरितार्थासाठी त्यांनी शाई, सुगंधी तेल तयार करून विकणे तसेच वृत्तपत्रे विकणे असे उद्योग केले. तसेच काही काळ येरवडा कारागृहामध्ये व मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी केली. कालांतराने लेखनास सुरुवात केली व 1934 मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला.
“एक रुपया दोन आणे’ ही त्यांची पहिली कथा यशवंत या मासिकात प्रसिद्ध झाली. याच मासिकाच्या कथा स्पर्धेत “शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथेस प्रथम पारितोषिक मिळाले. याच कथेवर “शेवग्याच्या शेंगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. “अन्नपूर्णा’, “वहिनींच्या बांगड्या’, “शेवग्याच्या शेंगा’, “माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य. गो. जोशी यांनी लिहिल्या होत्या.
त्यांचा पहिला कथासंग्रह “पुनर्भेट’ वर्ष 1932 मधे प्रकाशित झाला. वाचकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकरा वर्षांच्या कालखंडामध्ये या कथासंग्रहाचे सात भाग प्रसिद्ध झाले. तुळशीपत्र आणि इतर गोष्टी, रेघोट्यांचे दैवत, मायेच्या सावल्या, जाई-जुई आणि तरंग हे त्यांचे काही इतर उल्लेखनीय कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
भारतीय संस्कृतीतील उदात्त मूल्ये आणि गतकाळातील वैभवाविषयी प्रेम त्यांच्या ललित लेखनातून व्यक्त होते. “दुधाची घागर’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांनी आईचे हृदयस्पर्शी भावनांचे दर्शन घडविले आहे. य. गो. जोशी यांच्या संपादनाखाली 1947 साली “प्रसाद’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. अनुभवातून लिहिलेल्या त्यांच्या कथा तत्कालीन मध्यमवर्गीय जीवनाचे व लोकांच्या भावपूर्ण जिव्हाळ्याच्या संबंधाचे दर्शन घडविते. जोशी अर्थात भाऊसाहेब यांनी आपल्या 34 वर्षांच्या लेखन कारकिर्दीतील अत्यंत सात्विक लेखन करून स्वत:ची एक वेगळीच प्रतिमा वाचकांमध्ये निर्माण केली. त्यामुळे कुटुंबकथेचे प्रणेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. “संगीत भोळा शंकर’ या नाटकाच्या कथानकातून त्यांनी “शिवलीलामृत’ या धार्मिक लोकप्रिय पोथीत असलेला राजा श्रियाळ (शिराळशेठ) याच्या कथेचे सुंदर नाट्यरूपांतर केले आहे. वर्ष 1930च्या सुमारास लिहिलेले हे नाटक रंगभूमीवर नटवर्य रघुवीर सावकार यांनी 1933 मध्ये मंचावर आणले.
सुबोध ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरीचा अर्थ किंवा भाषांतर किंवा निरुपणात्मक लेखन नव्हे, तर जोशींच्या बुद्धीतून अवतरलेली ज्ञानेश्वरीची कथा. ही कथा 700 वर्षांपूर्वीच्या म्हाळसापुरीतील ज्ञानदेवांच्या प्राकृत ज्ञानेश्वरीच्या वाचन लेखन सोहळा कसा झाला याचे मराठी बोलीतून केलेले जणू वार्तांकनच.
श्रीकृष्ण व अर्जुनाच्या संवादाचे सुंदर विवेचन व निरूपणाचा त्या छोट्या गावातील प्रापंचिकांचा अनुभव सांगणाऱ्या घरगुती गोष्टींसह चित्रकार जिवाजी दीक्षित यांच्या चित्रातून लोकांच्या मनावर झालेला परिणाम कथानकातून त्यांनी मांडला आहे. हे वाचताना वाचक नेवासे येथे मनोमनी पोहोचतो व ज्ञानेश्वरीची अनुभूती घेतो. 7 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांचे निधन झाले.