-शर्मिला जगताप
भारताला स्वातंत्र्य मिळाले, मात्र स्वातंत्र्याला घाव बसून न भरणारी जखम झाली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर म्हणजे 1947 मध्ये घडलेल्या हिंसक घटनेने आजही डोळे ओले होतात. भारतातून पाकिस्तान वेगळा होताना जणू भारताचे एक अंग तुटून बाजूला पडल्याने भारतमातेलाही दुःख झाले होते. “पार्टिशन’ अशा नावाने याचा इतिहास लिहिला गेला. पुढच्या पिढीला ही जखम देणारी घटना शब्दबद्ध केली खुशवंतसिंग यांनी.
“ट्रेन टू पाकिस्तान’ हे पुस्तक या घटनेची दाहकता दाखविते. 1956 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक वाचताना आजही काळजाचा ठेका चुकतो. ही घटना टाळता आली असती तर… असा प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहात नाही.
पाकिस्तान-भारत ही नवी सीमारेषा आखली गेली. या सीमेवरील या गावाचा फाळणीशी संबंध नाही. या गावात मुस्लीम आणि शीख धर्मीय लोक राहतात. ते सर्व सुखासमाधानाने आयुष्य जगत असतात. या सीमेवरील मोनो माजरा या एका खेडेगावात या कादंबरीचे कथानक घडते. या गावाच्या जवळच एक नदी आहे. या नदीच्या पुलावरून रेल्वेरूळ गेलेला आहे. रोज या रुळावरून ट्रेन ये-जा करत असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन यासोबत जोडले गेले आहे.
गावातील गुंड जगतसिंग याच्याभोवती सुरुवातीलाच कथानक फिरते. ज्या रात्री गावातील सावकाराचा काही दरोडेखोर खून करतात, तेव्हा जगतसिंग त्याच्या प्रेयसीबरोबर गावाबाहेर एकांतक्षणी असतो. मात्र तरी त्याच्यावर या खुनाबाबत शंका उपस्थित केली जाते. पुढे याबाबत अनेक घटना घडतात. बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकू आल्यानंतर त्याच्या प्रेयसीची होणारी हृदयाची धडधड खुशवंतसिंग यांनी छान टिपली आहे…
शिखांच्या मृतदेहांनी भरलेली ट्रेन, शासनाची हतबलता अशा अनेक अंगांनी ही कादंबरी नटलेली आहे. वाचक या कथानकासोबत समरस होतो. यातील पात्रांना पडलेले प्रश्न जणू आपलेच प्रश्न असल्याचा भास होतो. खुशवंतसिंग यांच्या भक्कम लेखणीतून साकारलेली ही कादंबरी म्हणजे साहित्यातील एक ठेवा आहे.
या कादंबरीचे अनेक भाषेत भाषांतर झाले. मूळ इंग्रजीत असलेली ही कादंबरी अनिल किणीकर यांनी मराठी भाषेत अनुवादित केली आहे. खुशवंतसिंग यांची खास शैली मराठीतही जपली गेली आहे.