-माधव विव्दांस
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक जेपी दत्ता यांचा आज जन्मदिवस. त्यांचे चित्रपट देशभक्तीपर आहेत तसेच भव्य सेट, युद्धभूमीचे चित्रीकरण यामुळे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना भावले. त्यांना देशभक्तीपर चित्रपटांचे कुलगुरू असे संबोधले जाते. त्यांचे पूर्ण नाव ज्योती प्रकाश दत्ता.
त्यांचा जन्म मुंबई येथे 3 ऑक्टोबर, 1949 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथेच झाले. त्यांचे वडील ओपी दत्ता हे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या तालमीतच ते या व्यवसायात तरबेज झाले.त्यांनी फक्त 10 चित्रपट केले पण ते यशस्वी झाले. त्यांच्या चित्रपटांचे लेखन ते व त्यांचे वडील करीत असत. वर्ष 1976 मध्ये त्यांनी “सरहद’ हा चित्रपट बनविण्यास घेतला होता; पण तो पडद्यावर येऊ शकला नाही. ते विनोद खन्ना व बिंदिया गोस्वामी यांना घेऊन हा चित्रपट करीत होते. त्यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात वर्ष 1985 मध्ये “गुलामी’ चित्रपटापासून झाली. धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, नसीरुद्दीन शाह, रीना रॉय, स्मिता पाटील यांच्यासारख्या कलाकारांनी सुशोभित केलेला हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता.
जेपी “सरहद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते त्यावेळी बिंदिया गोस्वामी पण त्या चित्रपटात काम करीत होत्या. तेव्हापासून त्यांची ओळख वाढत गेली व त्याचे प्रेमात रूपांतर झाले आणि वर्ष 1985 त्यांचा विवाह झाला. त्या दोघांना निधी आणि सिद्धी या दोन मुली आहेत. निधी आता अभिनेत्री म्हणून काम करीत आहे.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत गुलामी, यतीम, बटवारा, उमराव जान, एलओसी कारगिल,रिफ्युजी, बॉर्डर, क्षत्रिय, हथियार, पलटण असे मोजकेच चित्रपट केले. वर्ष 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या “बॉर्डर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती व संवाद लेखन त्यांनीच केले. याचे चित्रीकरण राजस्थानच्या वाळवंटात झाले असून चित्रपटातील उत्कंठा वाढविणारी दृश्ये प्रभावीपणे चित्रित करण्यात आली. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाची गाणीही लोकप्रिय झाली. सोनू निगम यांनी गायलेले “के घर कब आओगे’ हे गाणे सगळ्यांचे आवडीचे झाले होते. तसेच ए. आर. रहेमान, हरिहरन, शंकर महादेवन, अलका याज्ञिक यांचाही आवाज या चित्रपटातील गाण्यांना मिळाला आहे. त्यांना बॉर्डर चित्रपटासाठी “राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात आला.
अभिषेक बच्चन यास त्यांनी 2000 सालच्या “रेफ्युजी’ ह्या चित्रपटामधून पहिल्यांदा संधी दिली. या चित्रपटाची कथा बांगलादेशमधून पाकिस्तानला कच्छ मार्गे जाणाऱ्या एका तरुणाची प्रेमकथा आहे. करिना आणि अभिषेक यांच्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम आहे असे ते सांगतात. वर्ष 2018 मध्ये झी स्टुडिओ निर्मित “पलटण’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. वर्ष 1962 मधील भारत-चीन युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सिक्किम आणि लडाखमध्ये झाले. यामध्ये चीनला भारताने कडवे प्रत्युत्तर दिल्याचे दाखविण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (2010) साठी फीचर फिल्म सेक्शन ज्युरीचे नेतृत्व केले. दत्ताजींचे अभिष्टचिंतन.