-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
चीनने भारतीय समाजात नेमक्या कमतरता कोणत्या आहेत त्या शोधल्या आहेत, त्याचा वापर करून ते आपल्या समाजातील विविध अंगात घुसखोरी करायचा प्रयत्न करतात आणि भारतात आपल्या हस्तकांची एक टीम निर्माण करत आहे.
चिनी सैनिकांना आक्रमक कारवाई करून शिखरावर असलेल्या भारतीयांना मागे ढकलण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु चिनी सैनिकांनी मात्र असे काहीही करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. थोडक्यात, चीन सैन्य युद्ध करण्यास तयार आहेत परंतु पारंपरिक युद्धात रक्त सांडण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही.
भारतीयांचे मतपरिवर्तन करणे म्हणजे इन्फ्लुअन्स ऑपरेशन हे चीनने अजून एक युद्ध सुरू केले आहे. यामध्ये नेमके काय होते? इन्फ्लुअन्स ऑपरेशन म्हणजे, चीन आपल्या प्रचंड आर्थिक बळाचा वापर करून भारतातील वेगवेगळ्या घटकांना विकत घेतो. त्यामध्ये भारतीय मीडियातील काही वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज माध्यमे ही चीनच्या बाजूने बोलतात. चीनशी व्यापार करावा, लढाई करू नये, लढाई आपल्याला परवडणार नाही वगैरे.
अनेक भारतीय व्यावसायिकांचे चीनमध्ये आर्थिक संबंध आहेत. अशा काही भारतीय कंपन्यांच्या मदतीने चीन भारतात हवालाद्वारे पैसे पाठवतो. उदा., अंडर इन्व्हॉइसिंग करणे. दहा कोटींचा माल आणून तो 1 कोटीचा दाखवायचा. जेणेकरून वरच्या 9 कोटींवर जीएसटी, आयात शुल्क लावावे लागणार नाही आणि तो माल बेकायदेशीरपणे भारतीय बाजारात अत्यंत स्वस्त किमतीत विकला जाईल. अशा प्रकारे अंडर इनव्हॉइसिंग करणाऱ्या कंपन्यांवर गुप्तहेर संस्थांनी लक्ष ठेवले पाहिजे. सध्या अनेक व्यावसायिकांची अवस्था खराब आहे. त्यांना कर्ज देऊन चीन आर्थिक मदत करतो आहे, असे भासवत आहे.
माध्यमांचा विचार करता गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये वर्तमानपत्रे, टीव्ही वर चीनच्या राजदूतांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी काय सांगितले, चीन हा मित्र देश आहे आणि त्याच्याशी संबंध सुधारले पाहिजे. भारताने विनाकारण लढू नये, लढाई भारताला परवडणार नाही, लढाई झाली तरी चीनशी आर्थिक व्यवहार भारताने सुरूच ठेवला पाहिजे, अशा प्रकारच्या मुलाखती वेळोवेळी घेतल्या जात आहे. प्रश्न विचारतानाही भारताची चूक आहे आणि चीन चांगला देश असल्याचे चित्र मांडले जाते. काही भारतीयांना भारताने चीनशी विनाकारण लढाई करू नये, वाटाघाटीने रस्ता शोधावा असे वाटते. परंतु इतक्या दिवसांच्या वाटाघाटीतून काहीही साध्य झालेले नाही. इन्फ्लूअन्स ऑपरेशनमुळे काही भारतीयांचे मतपरिवर्तन करण्यात चीनला यश मिळाले आहे.
चीनचे राजदूत कितीही गोड बोलत असले तरीही चीनचे वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्स दर दोन दिवसांनी भारताला धमक्या देण्याचा प्रयत्न करून तुमची अवस्था 1962 सारखी करू असे म्हणतो. मतपरिवर्तन झालेल्या लोकांचे मत आहे की, चीनला खूश करण्यासाठी अमेरिकेशी संबंध वाढवू नये, वन चायना धोरण बदलू नये, व्यापारी संबंध कमी करू नये,चीनने आंतरराष्ट्रीय कायदे पाळले नाही तरी भारताने पाळावे. काही सरकारला सांगतात की, चीनवर हल्ला करा.
दुर्दैवाने अनेक वेळा सरकारमधील महत्त्वाचे अधिकारी चीनला घाबरून वागतात. अनेकवेळा चीनचे नावही घ्यायला तयार नसतात. चीन काय करतो हे आपण स्पष्टपणे बोलत नाही. अजूनही आपल्या चिनी धोरणावर त्यांची पकड आहे, जे अजूनही म्हणतात की, वाटाघाटी करून चीनबरोबरचे आपले संबंध सुधारू शकतो. त्यांचे मतपरिवर्तन करणे सर्वात जास्त जरुरी आहे. भारतीय सैन्याच्या मताला/सल्ल्याला पुरेसे महत्त्व दिले जावे.
भारतीय गुप्तहेर संस्थांनी सातत्याने चीनमध्ये जाणाऱ्या व्यक्ती माध्यमातील असो, व्यावसायिक असो, ज्यांनी माध्यमांतून पुष्कळ पैसे गुंतवायला सुरूवात केली आहे, अशा लोकांवर लक्ष ठेवले पाहिजे. अनेक कंपन्या चीनकडून कर्ज घेताहेत, त्यांना चीनची गुप्तहेरी करण्यास भाग पाडले जाते, त्यांच्यावर लक्ष असावे. चीन भारतातील विद्यापीठांत घुसखोरी करण्यासाठी अभ्यासकेंद्रं उभारण्याच्या प्रयत्नात आहे. हे पूर्णपणे थांबले पाहिजे. यामुळे अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना चीन विकत घेण्याचा प्रयत्न करील.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांकडून धडा घेत आपण या मत परिवर्तनाच्या युद्धावर लक्ष ठेवले पाहिजे. जेणेकरून भारतामध्ये मोठा धोका निर्माण होण्याआधीच अशा हस्तकांना आपण पकडू शकतो. त्यातून चीनच्या या मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नाला थांबवू शकतो. चीन भारताशी 365 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने लढतो आहे. भारतातही चिनी युद्ध प्रकाराचा नियमित अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे याचे नियोजन करून कृती केली पाहिजे.