आज जागतिक चिंतेचा विषय म्हणजे वाढत चाललेले मानसिक अनारोग्य. दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणी, ताणतणाव, नैराश्य यामुळे मानसिक आजार झपाट्याने वाढत आहेत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. त्यानिमित्त…
“सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण हे जागतिक प्राधान्य बनवा’ हे या वर्षासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. वर्ष 1992 मध्ये प्रथम उपमहासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने व वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या संस्थेचे 150 पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य असून या दिवशी, मानसिक आजार आणि मानवाच्या जीवनावर होणारे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा केला जातो. “आरोग्य म्हणजे केवळ आजार व दुर्बलता यांचा अभाव नव्हे, तर त्या जोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण स्थिती असणे होय’, अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली आहे.
आज मानवाला सर्व भौतिक सुखे प्राप्त होत आहेत. जग जणू प्रकाशाच्या वेगाने जात आहे. या प्रचंड वेगात शरीराच्या पायभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. जबाबदारी आणि सर्व क्षेत्रातील स्पर्धा यामुळे प्रचंड मानसिक थकवा येतो. पण पुढे जाण्याच्या शर्यतीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपले शरीर सुदृढ ठेवत असताना मनाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे शरीर कितीही कार्यक्षम असू दे, तुमच्याकडे भरपूर कल्पनाशक्ती आहे, तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण मनाची साथ नसेल तर काही साध्य होत नाही. घरातील एका माणसाचे मानसिक स्वाथ्य बिघडले तर सर्व कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते. “शहाण्यांचे व्हावे चाकर पण मूर्खाचे होऊ नये धनी’ अशी एक म्हण मराठीमध्ये रूढ आहे. मन आणि शरीर दोनही गोष्टी परस्पर पूरक असून मनुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. मानसिक विकार हा बरेचदा आनुवंशिकतेने असतो, पण यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हा विकार जन्मतः असल्यास गर्भावस्थेतील अपुऱ्या वाढीमुळेही होतो. यासाठी गर्भवती महिलेचे आरोग्य आनंददायी असणे गरजेचे आहे.
सुखसोई वाढल्या, उत्पन्न वाढले, गरजही वाढतच चालल्या आहेत, यामधे शरीर आणि मानसिक ओढाताणही वाढत चालली आहे. एखाद्या कुटुंबास “देता किती घेशील दोन कराने’ अशी चंगळ आहे. त्यातून चंगळवाद फोफावत आहे. त्याचवेळी दुसरीकडे “बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था आहे. ही विषमताही स्वाथ्य बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या तरुण वर्गाची अवस्थाही बिकट आहे. बुद्धिवंताला साजेसे काम मिळण्याची चिंता, तर कष्टकऱ्याला हाताला काम मिळण्याची चिंता.अशा वेळेला दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणाऱ्याला असूया निर्माण होते, तसेच सुखात लोळणाऱ्याला दुसऱ्याबद्दल तुच्छता वाटते. घरातील करता पुरुष किंवा स्त्री जेव्हा कामासाठी बाहेर पडते तेव्हा घरातील वृद्ध व बालगोपाळ त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असतास. धनी घरात सुखरूप येईल ना? त्याला येताना गाडी मिळेल का? अशा अनेक प्रश्नांनी मन चिंतेनेच व्याकुळ होत असते. सध्या चित्रपटातून दाखविले जाणारे दृश्ये पाहून तरुणांचे मनात नको ती आकर्षणे, नको तेव्हा निर्माण होतात. सध्या मोबाइल हा एक मानसिक अवस्थेचा शत्रू प्रत्येकाच्या हातात असतो. पालकांनी आपली मुले काय बघतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अकारण दुःखी होणे, कशातही मन रमत नाही, इतरांबरोबर मिळून मिसळून न राहणे या सर्व “अतिनैराश्याच्या’ खाणाखुणा आहेत. तसेच व्यक्तीच्या मनावर सतत ताण असणे, अस्वस्थता, अधिरेपणा, कारण नसतानाही कशाची तरी भीती वाटत राहणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. विनाकारण सतत बोलणे, कारण नसताना अतिबडबड, अनाकलनीय शारीरिक हालचाली या बरोबर अवाजवी आनंदाचे प्रदर्शन केले जाते. 21 व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञ सांगत आहेत. या सर्वांची परिणीती म्हणजे ज्याला आपण वेड म्हणतो, अशा अवस्थेत मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यास यावर उपाय नक्कीच आहे.
सर्वसामान्य नागरिक तसेच त्या रुग्णाचे नातेवाईक मनोविकार किंवा मानसिक रुग्ण म्हटले की त्याला जवळ करत नाहीत. हा आजार नसून कोणीतरी बुवाबाजी किंवा जादूटोणा केला आहे, असाच या लोकांचा समज असतो. या गैरसमजामुळे रुग्णाला डॉक्टरांकडे नेले जात नाही किंवा नेतात त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. आता मानसोपचाराच्या अनेक आधुनिक पद्धतीही उपलब्ध आहेत.
मानसचिकित्सा क्षेत्रातील व्याख्येनुसार, मानसिक विकारांचा मानसशास्त्रीय पद्धतीने उपचार केला जातो. ज्येष्ठ व अनुभवी उपचारतज्ज्ञाची मानसोपचारपद्धत अभ्यासपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आत्महत्या या ताणतणावातून, नैराश्यातूनच होतात.या गोष्टीला जीवघेणी स्पर्धा कारणीभूत ठरते. अनेक विद्यार्थी परीक्षेत गुणवत्ता न मिळणे, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळणे यामुळे वैफल्यग्रस्त होतात. याची जबाबदारी थोडीफार पालकांकडे जाते. मुलांवर अपेक्षांचे ओझे लादले जाते. दोन भावंडामधे डावेउजवे करू नये, त्यांच्या गुणवत्तेबद्दल त्यांच्यासमोर चर्चा करणेही घातक ठरू शकते. नोकरी करणाऱ्या दांपत्यामध्ये बरेचदा गैरसमज निर्माण होतात व त्यामुळेही दोघांचेही मनस्वाथ्य बिघडते तसेच वाद होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते. त्याची परिणिती घटस्फोटात होते. पण अशा प्रकरणात जर संतती असेल तर त्यांचे हाल होतात, प्रसंगी मुलांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकते. नियमित व्यायाम, योगा यांचा उपयोग शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास चांगला होऊ शकतो.
आपले, आपल्या कुटुंबाचे, आपल्या मित्रांचे, पुढील पिढीचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याचा संकल्प करूया.