मध्यंतरीच्या काळात मुंबई आणि अंमली पदार्थ या संदर्भाने दररोज काथ्याकूट सुरू होता. विशेषतः बॉलिवूड म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांचा प्रमुख अड्डाच, असं वातावरण तयार झालं होतं.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि त्यानंतर किंग खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक या घटनांमुळे “बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन’ वगैरे रोज ऐकावं-पाहावं लागत होतं. आता ड्रग्जशी संबंधित मुंबईतून बातम्या येणं बंदच झालं. परंतु दोन ग्रॅम, पाच ग्रॅम ड्रग्ज सापडल्याच्या घटनांनी मध्यंतरी खूपच कल्लोळ माजवला होता. वस्तुतः त्याच वेळी गुजरातच्या बंदरात किलोच्या हिशोबात अंमली पदार्थ सापडले होते. त्यांची किंमत शेकडो कोटी रुपये असूनसुद्धा बातम्यांच्या दुनियेत त्या घटनेला फारशी “किंमत’ मिळाली नाही. काही प्रकरणं सोयीनुसार गाजवली जात असल्याचा आरोप त्यावेळी केला जात होता.
परंतु अंमली पदार्थांच्या तस्करीची जागतिक साखळी ही अशी सोयीनुसार हाताळण्याची गोष्ट नाही. अतिमागास देशांपासून अतिप्रगत देशांपर्यंत जोडली गेलेली ही साखळी अत्यंत उग्र स्वरूप धारण करतीये, हे गेल्या गुरुवारी मेक्सिको सिटीत घडलेल्या घटनेवरून दिसून आलंय. “ड्रग्ज वॉर’मुळे तिथं हकनाक अनेकांचे बळी नेहमीच जातात. परंतु गुरुवारी हे ड्रग्ज माफिया चर्चेत आले, ते महापौर कॉनराडो मेंडोज यांच्या मृत्यूमुळे. मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्येच ड्रग्जदादांचं गॅंगवॉर झालं आणि महापौरांसह 18 जणांचा बळी गेला. या घटनेच्या निमित्तानं ड्रग्ज माफियांची जी माहिती समोर आली आहे, ती थरकाप उडवणारी आहे.
मुळात मेक्सिकोच्या गृह मंत्रालयानंच हे कबूल केलंय की, देशात दररोज सरासरी 120 हत्या होतात. ड्रग्ज माफियांच्या गॅंगवॉरमध्ये आतापर्यंत तिथे दोन लाख लोकांचा मृत्यू झालाय. त्यातल्या 50 हजार मृतदेहांची ओळख पटवणारं कुणी नाही. 50 हजार लोक बेपत्ता आहेत, त्यांना शोधणारं कुणी नाही. मुळात मेक्सिकोत आता अंमली पदार्थांच्या माफियांचं शत्रुत्व गॅंगवॉरपर्यंत सीमित राहिलेलं नाही. कारण गॅंगचं रूपांतर चक्क खासगी लष्करांमध्ये झालंय. या संघटित गुन्हेगारांकडे तब्बल 75 हजारांपेक्षा अधिक “सैनिक’ आहेत. एके-47 रायफल चालवणं म्हणजे या मंडळींना काहीच वाटत नाही.
देशाच्या अधिकृत सुरक्षा जवानांकडून दरवर्षी जप्त केलेल्या रायफलींचीच संख्या 20 हजारांच्या घरात जाते. हे ड्रग्ज माफिया तिथल्या राजकीय पक्षांना मोठमोठ्या देणग्या देतात म्हणे! एवढंच नव्हे तर त्यांच्या गॅंगच निवडणुका लढवू लागल्यात. या मंडळींची गॅंगवॉर साधी नसतात. क्रौर्याची परिसीमा त्यात दिसून येते. खून करून मृतदेह छिन्नविच्छिन्न करणं, सार्वजनिक ठिकाणी टांगून ठेवणं, अपहरण करून नंतर हालहाल करून मारणं, त्याचे व्हिडिओ व्हायरल करणं असे प्रकार या टोळीयुद्धांमध्ये सर्रास चालतात.
एवढंच नव्हे तर या टोळ्यांनी स्वतःच्या छळछावण्याही उभारल्यात. प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना पळवून आणून या छावण्यांमध्ये ठेवलं जातं. गॅंगचे काही “सैनिक’ बाहेर पहारा देतात, तर काही सैनिक संबंधिताचा छळ करतात. हे सगळं वर्णन हॉलिवूडच्या सिनेमातलं वाटेल; पण हेच वास्तव आहे. तात्पर्य, अंमली पदार्थांच्या तस्करांना खुट्टा बळकट करण्याची संधी देणं म्हणजे भस्मासुराला वरदान देणं. बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शनच्या पलीकडे बरंच काही आहे आणि ते वाढतंच चाललंय..!