भारतातील सत्ताकारण म्हणजे खरंतर भाऊबंदकी. कारण एकाच घरातील काही व्यक्ती सत्ताधारी पक्षात दिसतात तर काही विरोधात. जनतेच्या दृष्टीने ते वेगळी दिसतात पण त्यांच्यात मुळातच घरोबा असतो.
अमेरिकेतील एक अग्रगण्य राजकीय परिवार म्हणून रॉकफेलरचं नाव घेतलं जातं. असं म्हटलं जातं की अमेरिकेत डेमोक्रेटिक किंवा रिपब्लिकन कोणताही पक्ष सत्तेवर असो या परिवाराचा कोणता ना कोणता प्रतिनिधी सत्ता वर्तुळात असतोच. अर्थात, ही व्यक्ती संपूर्ण परिवाराच्या आर्थिक हितसंबंध योग्य राहतील याची काळजी घेत असतो. काहीसा तोच प्रकार 1948 पासून सिनेटपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या केनेडी परिवाराचा आहे. मध्यंतरी या परिवाराचे जावई आणि सिनेअभिनेते अरनॉल्ड श्वार्झनेगर हे रिपब्लिकन पक्षाचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते.
भारतात हा प्रकार सुरू केला असेल, तर शिंदे परिवाराने. एकेकाळी जनसंघ हा त्यांच्या आर्थिक पाठिंब्यावर अवलंबून असायचा. राजमाता विजयराजे शिंदे यांच्यानंतर मात्र त्यांचे चिरंजीव माधवराव यांनी 1977 साली कॉंग्रेसचा हात धरला. राजमातांच्या नंतर त्यांच्या दोन्ही मुली वसुंधराराजे आणि यशोधराराजे यांनी भाजपचेच कमळ हाती धरले. मात्र, माधवराव आणि त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य यांनी 2020 पर्यंत कॉंग्रेसची साथ सोडली नाही. अर्थात, भाजप किंवा कॉंग्रेस कोणताही पक्ष सत्तेवर आला तरीही धनाढ्य शिंदे परिवाराचे आर्थिक हितसंबध जपले जातात.
राम मंदिर आंदोलनापासून देशात अघोषित द्विपक्षीय पद्धती सुरू असून त्यापैकी एक पक्ष अर्थात कॉंग्रेस तर दुसरा भाजप. कॉंग्रेस धार्जिण्या परिवारातील एक ना एक प्रतिनिधी आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न भाजपनेसुद्धा जाणीवपूर्वक केल्याचं दिसतं. नेहरू-गांधी परिवारातील अरुण नेहरू, मनेका, वरुण गांधी, तसेच मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री या माजी पंतप्रधानांचे नातू, चंद्रशेखर यांचे चिरंजीव, बिजू पटनायक यासारख्या क्षेत्रीय नेत्यांचे नातेवाईक आज आपल्याला भाजपमध्ये आढळतात. यात त्या राजकीय परिवाराचा मुख्य फायदा असतो. सत्तेचं पारडं कोणाच्याही बाजूनी झुकलं तरीही परिवाराची सत्ता अबाधित राहते. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे असलो तरीही परिवार म्हणून एकच आहोत, असं सांगायलाही मोकळे. भलेही यांचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडोत, परिवारात फूट पाडण्याच्या तथाकथित “पुण्यकर्म’ करण्यात भाजप नेहमी आघाडीवर असतो.
देशातील प्रत्येक राजकीय परिवारातील एक ना एक प्रतिनिधी आपल्या पंखाखाली घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच की काय आजही अजित पवारांच्या बाबतीत भाजप फार “सॉफ्ट’ राहतो. अर्थात, याला कारण पहाटेचा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आहे, असं मानण्यास हरकत नाही. या राजकीय परिवाराच्या फुटीच्या मांदियाळीत राज ठाकरे यांच्याकडे भाजपचं लक्ष केव्हापासून होतं. एकेकाळी पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगीत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे युतीसाठी बरे असे सांगायचे. आज हा सगळा इतिहास सांगायचं कारण मशिदींवरील भोंग्यांपासून तर बाबरीपर्यंत ठाकरे परिवारातील हे दोन बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. वास्तविक देशाच्या आर्थिक डबघाईच्या काळात आर्थिक प्रश्न सोडवावेत की निरर्थक प्रश्नांना हात घालावा, हाही एक प्रश्नच आहे.
महाराष्ट्रासारखे आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा हात धरल्याने आपल्या हातून गेल्याचं दुःख भाजपच्या इतकं जिव्हारी झोंबले आहे की, त्यांनी उद्धव विरुद्ध उभे केले आहे राज यांनाच. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद दिलं उद्धव ठाकरेंना, तर भाजपने त्यांच्याविरुद्ध तोफ डागली राज यांच्या रूपाने. पारिवारिक मामला. बाळासाहेबांचा खरा वारस मीच हे सांगण्यासाठी आणि त्या वारसातील थोडा तरी भाग आपल्याला मिळावा यासाठी.
सत्तेची भाऊबंदकी सध्या दोन भावात सुरू आहे. भाजप एका भावाच्या विरोधात आहे, तर दुसऱ्या भावाला सध्या गरजेनुसार वापरून घेत आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी हेच भाजपचे नेते एकाच वेळी दोन्ही बंधूंच्या मागे फिरायचे. कारण बाळासाहेबांशी बोलण्याची हिंमत प्रमोद महाजन वगळता कोणाही भाजप नेत्यात नव्हती. एक प्रकारे राज्यातील सत्तेचं समीकरण कसंही झालं तरीही त्यात ठाकरे परिवार हा कुठल्या ना कुठल्या सत्तेच्या जवळच्या स्थानावर राहणारच. बाहेर कार्यकर्ते एकमेकांची कितीही डोकी फोडोत परिवारातील सर्व कामे होणारच. भारतात शिंदेने परिवारापासून 1977 साली सुरू केलेलं हे सत्तेच नवीन समीकरण महाराष्ट्रातही अगदी तालुका, जिल्ह्यातील राजकारणापासून राज्य स्तरावरील राजकारणापर्यंत दिसायला लागलेलं आहे.
सत्तेसाठी भाऊबंदकीच्या मागे लपून मशिदींवरील भोंग्यांपासून अनेक निरर्थक पण भावनिक मुद्द्यांवर बोलणाऱ्या “तिसऱ्या’चा कावा जनतेने ओळखावा!