देशी भाषात बोलण्यात अभिमान बाळगला पाहिजे!
मुंबई, ता. 6 – देशी भाषात बोलण्यात लोकांनी अभिमान बाळगला पाहिजे, असे उद्गार पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या अधिवेशन प्रसंगी काढले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी हिंदीमधून केली. नंतर त्यांनी इंग्रजीतून भाषण केले. त्या म्हणाल्या, “मी इंग्लिश भाषेच्या विरोधी नाही. जगाच्या निरनिराळ्या भागांत काय घडत आहे हे जाणण्यासाठी इंग्रजी शिकलेच पाहिजे.’
दुष्काळ निवारण कार्याचा इंदिराजींकडून गौरव
मुंबई – दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्र सरकार, दुष्काळ निवारण समिती, इतर संस्था यांनी केलेल्या कार्याचा पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आज गौरव केला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या या कार्याचे अनुकरण इतर राज्यांनी करावे.
कलता मनोरा धोक्यात
पिसा – येथील टस्कन शहरातील नागरिकांना सरकारने असा इशारा दिला आहे की, त्यांनी प्रसिद्ध कलता मनोऱ्या खालून पाणी भरण्याचे बंद करावे; नाहीतर त्या मनोऱ्याला धोका निर्माण होईल. पाण्याची पातळी खाली गेली म्हणजे जमीन खचेल म्हणून मनोऱ्याच्या 1500 मीटरच्या परिसरातून पाणी उपसण्याचे बंद करावे.
अवर्षणग्रस्त भागातही भरघोस येतील अशा पिकांच्या जाती शोधा!
पुणे – महाराष्ट्रातील साडेपाच कोटी जनतेसाठी वार्षिक 105 लक्ष टन धान्याची गरज आहे. परंतु आपले सर्वाधिक उत्पन्न 67.6 लक्ष टन झालेले होते म्हणून अशी असलेली तूट भरून काढण्यासाठी व गरजेइतके उत्पादन होण्यासाठी अवर्षणग्रस्त भागातही भरघोस येणाऱ्या ज्वारी, बाजरी, भात, गव्हाच्या नव्या जाती शोधून काढण्याचे आवाहन कृषितज्ज्ञांना कृषिमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज येथे केले.