अटकेतील खासदारांना कोणताही अधिकार नाही
विशाखापट्टण, दि. 16 – संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर सध्याच्या आणीबाणीचा कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, असे आज राज्यसभेचे उपाध्यक्ष गौडे मुराहरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, नेहमीप्रमाणे वार्ताहरांना संपूर्ण कामकाजावेळी गृहात प्रवेश दिला जाईल. ते पुढे म्हणाले की, “मिसा’खाली काही खासदारांना अटक करण्यात आली आहे. ते अधिवेशनास उपस्थित राहण्याचा हक्क बजावू शकतील काय? या प्रश्नाला उत्तर देताना, अटक झालेल्यांना तसा अधिकार नसल्याचे मुराहरे म्हणाले.
फरारी व्यक्तींची मालमत्ता जप्त करण्याचा वटहुकूम
नवी दिल्ली – राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी काढलेल्या एका वटहुकूमान्वये “मिसा’ कायद्याखाली अटक केलेल्या कोणाही व्यक्तीस, यामध्ये परकीय व्यक्तींचाही समावेश आहे, आपल्या सुटकेसाठी कोणत्याही कायद्यानुसार दावा दाखल करता येणार नाही. ज्या व्यक्तीविरुद्ध अटक करण्याची आज्ञा काढण्यात आलेली असेल व ती व्यक्ती फरारी असेल तर तिची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही वटहुकूमात करण्यात आली आहे. तात्पुरत्या सुटकेवर तुरूंगातून बाहेर पडलेली व्यक्ती पळून गेल्यास अगर पुन्हा तुरूंगात न आल्यास त्या व्यक्तीचीही मालमत्ता जप्त केली जाईल.