नेहमीच्या भावात भरपूर रॉकेल तेल मिळेल
मुंबई – मुंबई सरकारने केलेल्या विनंतीनुसार भारत सरकारने भरपूर प्रमाणात केरोसीन तेल आयात करण्यास परवानगी दिली आहे. कोठलीही कपात न करता रॉकेल विक्रेत्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे तेलाचा पुरवठा करावा अशी सूचनाही भारत सरकारने तेल कंपन्यांच्या मालकांना
दिली आहे.
मानवी स्वातंत्र्य मारक पद्धती भारतास वर्ज्य
लॉस एंजल्स, ता. 5 – मानवी स्वातंत्र्याची गळचेपी करणारी कोणतीही राज्यपद्धती भारत स्वीकारणार नाही, असे भारताचे येथील वकील एम. सी. छगला यांनी निवेदन केले. छगला येथे पत्रकारांना मुलाखत देताना पुढे म्हणाले, लोकशाहीत माणसाचे स्वातंत्र्य लयाला गेले तर लोकशाही मुळीच यशस्वी होणार नाही. अमेरिकाही या अर्थाने समाजवादी आहे. त्याची तिला जाणीव नाही एवढेच. प्रत्येक राष्ट्र समाजवादाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असाही त्यांनी अभिप्राय व्यक्त केला.
आकर्षक साहित्याविरुद्ध एकाकी आवाज उठविण्याने कार्यभाग साधणार नाही!
एका शालेय समारंभाच्या निमित्ताने ग. दि. माडगूळकर यांनी चवचाल साहित्याबद्दल आपली नापसंती व्यक्त केली. चवचाल साहित्य आणि सिनेमा यामुळे तरूण पिढी बिघडत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. उतरणीस लागलेल्या नैतिक मूल्यांना कोठेतरी पायबंद बसावा म्हणून आपण गीतरामायण रचले असेही त्यांनी याच प्रसंगाचे निमित्त करून सांगितले.
गीतरामायणाचा प्रसारही त्यांच्यामते पुष्कळ झाला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, समाजामध्ये वाईटावर उतारा म्हणून निव्वळ चांगल्या गोष्टीचे अस्तित्व असून चालत नाही. जे समाजधारणेस, नैतिकमूल्य संवर्धनास अपायकारक ते नष्ट करावे लागते. नाहीपेक्षा वाईटाच्या मानाने खंडोगणती चांगले वाङ्मय समाजामध्ये विद्यमान असते, आजही आहे, परंतु त्याच्या निव्वळ असण्याचा उपयोग होत नाही. त्याचा प्रसार व्हावा लागतो.