-हभप प्रशांत महाराज मोरे देहूकर
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ।।
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ।।
माऊली म्हणतात, जे उत्पन्न होते ते नष्ट होते आणि नष्ट झालेले पुनः दुसऱ्या रूपाने दिसते. जसे रहाटगाडगे फिरते तसे उत्पत्ती-नाश फिरत राहतात किंवा चंद्र-सूर्याचा उदय-अस्त आपोआप आणि अखंड होत असतात. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू हेही जगात सारखे होत असतात. ती प्रक्रिया जगातून नाहीशी होणे शक्य नाही. किंबहुना ते अपरिहार्य आहे.
जेव्हा महाप्रलयाची वेळ येते तेव्हा सर्व त्रैलोक्याचा संहार म्हणजे नाश होतो. म्हणून उत्पत्ती-नाश अटळ आहेत. कोणतीही व्यक्ती जन्माला आली किंवा एखादी वस्तू उत्पन्न झाली तर तिचा नाश ठरलेला आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून त्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी आसक्ती आणि मोह ठेवणे म्हणजे दुःखाला आमंत्रणच आहे.