-माधुरी तळवलकर
बुध म्हणजे जागे होणे. ही फिल्म तीन पातळ्यांवर घडताना दिसते. आधी दिसते एक खेडेगावातले घर. बाहेरच्या खाटेवर एक अगदी लहान मुलगी किरकिर करतेय. तिच्याकडे लक्ष द्यायला तिच्या आईला वेळ नाहीय. दोन दोन कळशा भरून पाणी आणतेय. मग ती चुलीवर भाजी करते. कशाला तरी बाहेर येते नि रडणाऱ्या मुलीला प्रेमानं जवळ घेते. तेवढ्यात भाजी जळल्याचा वास आल्यावर पळत येते. बघते तर भाजी जळतेय. तिथेच बसलेली सासू, या निमित्ताने तिला रागावते व तिला दोन्ही मुलीच म्हणून सुनेला शिव्या घालते. नवरा येतो, तो तिला फुकटचं खाते म्हणून मारतो.
त्याच वेळी दुसरं दृश्य सुरू होतं. ऑफिसर नवरा केबिनमध्ये डबा खातोय. आधुनिक दिसणारी त्याची बायको फोन करून जेवण कसे झालेय ते प्रेमाने विचारते. तो खेकसून फोन बंद करतो. घरी आल्यावर ती त्याला पाणी देते तर म्हणतो, “नाटकं नकोयत मला.’ ही ग्लास ठेवून निघून जाते. त्यावर, “ऍटिट्यूड दाखवू नकोस… कमवायची अक्कल नाही…’ असं म्हणून तिच्यावर हात टाकतो.
मग तिसऱ्या दृश्यात कॉलेजमधली मुलगी दिसते. तीन वर्षांपासून एका मुलाशी तिची मैत्री आहे आणि आता तो दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडलाय. हिच्याशी तो उद्धटपणे बोलतो. ही दुखावते. रडत, झुरत राहते.
सुशिक्षित असो की अशिक्षित, गरीब असो की श्रीमंत, विवाहित असो की अविवाहित; पुरुषांकडून बाईवर अन्याय होतच असतो असे लक्षात येते. पण मग हळूहळू बदल होऊ लागतो. खेड्यातली बायको एक दिवस नवरा मारायला पुढे येत असताना त्याला थांबवते. एका सरकारी योजनेतून काही कामधंदा मिळू शकेल का, ते पाहायला दोन्ही मुलींना घेऊन घराबाहेर पडते.
सुशिक्षित तरुणी माहेरी नवऱ्याबद्दल सांगते तर घरचे म्हणतात, लग्न झाल्यावर सहन करावे लागेल. तिचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालाय. मग ती तो व्यवसाय मनःपूर्वक लक्ष घालून सुरू करते. तिच्या कलेचे चीज होते. कॉलेजमधली मुलगी आपला विश्वासघात झाल्याचे विसरण्यात यशस्वी होते आणि इतरांशी हसूनखेळून राहू लागते. या तिघींनीही वेगळ्या वाटेवरून चालायला सुरुवात केल्यावर अडचणी आल्याच. पण त्या जिद्दीने त्यावर मात करतात. त्यांची अस्मिता जागी होते आणि एका नव्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू होतो.
असं म्हटलं जातं की, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. या तिघी स्त्रिया अन्याय सहन करण्याचं नाकारतात. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या, स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक स्त्रियांचं या तिघीजणी “बुध’ नावाच्या या फिल्ममध्ये प्रतिनिधित्व करतात आणि त्यातून एक आशादायक चित्र निर्माण होतं.