धक्के खाण्याचे दिवस आहेत. पूर्वी फक्त बसमध्ये किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी किंवा रांगेत आपण धक्के खात होतो. आता धक्के खात कामावर जावं तर तिथेही धक्के खावे लागतात. धक्के खात संध्याकाळी घरी यावं तर टीव्ही धक्के देतो. धक्का नसलेलं बातमीपत्र किंवा टीव्ही सीरिअल बघून खूप मोठा काळ लोटलाय. त्यामुळे सतत कुणीतरी दरवाजाच्या मागे दडून बसलंय आणि आपण प्रवेश केला की “भॉ’ म्हणून आपल्याला दचकायला लावणार, असं फीलिंग हल्ली 24 तास असतं.
राजकारणात तर धक्के देणं हेच मुख्य काम होऊन बसलंय. धक्कातंत्र वापरलं की आपण आवाक होतो, पुढचे काही दिवस त्या धक्क्यातून सावरण्यात जातात. तोपर्यंत यांच्याकडे दुसरा धक्का तयार असतो. एकंदरीत, राजकारण कशासाठी करायचं असतं, सरकार नावाच्या यंत्रणेकडून सामान्य आणि विशिष्ट स्थितीत नेमकं काय अपेक्षित असतं, हा विषय मागे पडण्याची उत्तम सोय करून ठेवलेली आहे.
एके दिवशी राज्यातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू गुजरातकडे सरकतो. रात्रीपर्यंत सूरत शहर चर्चेत असतं. सकाळी उठून डोळे चोळत पाहावं, तर केंद्रबिंदू पार आसामकडे जाऊन टेकलेला असतो. तिथून तो गोव्यात येतो, मग हळूहळू मुंबईत येतो. मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी नावं लोकांनी गृहित धरलेली असतात, त्यांची आदलाबदल होते आणि पुन्हा एक धक्का बसतो.
धक्क्यांची सवय लागल्यानंतर मात्र महिना उलटून गेला तरी इतकी शांतता, की धक्क्यांसाठी कुणाकडे आशेनं पाहावं हे कळत नाही. करमणुकीखातर दिल्लीवाऱ्या मोजाव्या लागतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना अमक्या खात्याचा मंत्री कोण, असा प्रश्न विचारला तर काय उत्तर लिहावं हेही कळत नाही. ड्रायव्हरच नसताना सगळ्या गाड्या व्यवस्थित चालल्यात, हे पाहून ड्रायव्हर नावाच्या यंत्रणेचाच फेरविचार करावा की काय, असं वाटू लागतं. त्यातच मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिल्यामुळे डोक्यातल्या गोंधळात भर पडते.
गोंधळ कमी करण्यासाठी गूगल करावं म्हटलं तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावापुढे “उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री’ हे पद लागलेलं अचानक दिसू लागतं. गूगलचासुद्धा इतका गोंधळ उडत असेल तर आम्ही कुणाकडे बघायचं? आधी नावांची आदलाबदल झाली आणि आता थेट उत्तर प्रदेश? आधीच उपमुख्यमंत्र्यांनी इच्छा नसताना त्यांनी पक्षादेश मान्य करून पद स्वीकारल्याची चर्चा… त्यात एके दिवशी अचानक ते थेट उत्तर प्रदेशात काम करू लागल्याचं गूगलबाबा सांगतो. धक्क्यांची सवय लागल्यामुळे हासुद्धा पक्षादेशच असावा आणि दिल्लीहून ते रातोरात लखनौला गेले असावेत, असं वाटणं स्वाभाविक आहे की नाही? गूगलबाबा फसला की फसवतोय, यावर चर्चा करण्याइतके वाईट दिवस आलेत?
मग वाटतं, बरेच दिवस धक्कादायक बातमी द्यायला कुणी नाही, म्हणून ती जबाबदारी गूगलबाबावर सोपवली की काय? तेवढेच दोन दिवस या चर्चेत निघून जातील. मग सामूहिक चर्चेसाठी दुसरं एखादं “धक्कादायक’ कारण शोधता येईल. सरकार नावाची यंत्रणा जेव्हा (दोनपेक्षा अधिक संख्येनं) कार्यरत होईल तेव्हा होईल; पण तोपर्यंत धक्क्यांची मालिका तर सुरूच ठेवलीच पाहिजे! “बरेच दिवस झाले यार धक्का खाऊन,’ असं कुणी म्हणता कामा नये!