दरवर्षीच विघ्नहर्त्याचे आगमन होत असते आणि या चैतन्यमूर्तीच्या आगमनाने नेहमीच समाजात आणि घराघरात चैतन्य निर्माण होत असते. प्रापंचिक अडचणीच्या रडगाण्यांमुळे घायकुतीला आलेला समाज या देवतेच्या आगमनाने आपले दैन्य क्षणभरासाठी का होईना विसरत असतो. त्यामुळे दैन्य, दु:खाचा विसर पाडणारा हा बाप्पा नेहमीच सर्वांना हवाहवासा वाटतो. यंदाच्या गणेशोत्सवाची विशेष बाब ही की गेली दोन वर्षे करोनाच्या कारणामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध होते.
निर्बंध म्हणजे जवळपास उत्सवबंदीच होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत बाप्पांचे आगमन होऊनही समाजात म्हणावे तसे आनंददायी वातावरण नव्हते. करोनाच्या धास्तीने बहुतांश समाज घरातच बंद होता. घरातील कोणा ना कोणाला हा समाज गमावून बसला होता. त्यातच उद्योगधंदे बंद झाल्याने हा समाज आणखीनच घायकुतीला आला होता. पण दोन वर्षाच्या अवधीनंतर आता निर्बंधमुक्त वातावरणात श्रींचे आगमन होत असल्याने त्याच्या स्वागताची सर्वत्र जोरदार लगबग सुरू झाली आहे. पुण्यात गेले आठवडाभर गणरायाच्या स्वागताची खरेदी करण्यासाठी रस्ते ओसंडून वाहू लागले आहेत. तशातच गणेश मंडळांचे मांडवही गल्लोगल्ली उभारले गेल्याने मुळातच वाहतुकीला अपुरे असलेले रस्ते आणखीनच आक्रसले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून कशीबशी वाट काढत लोक खरेदीची गर्दी करीतच राहिले आहेत. खरेदीच्या सर्वच वस्तूंचे भाव यंदा गगनाला भिडल्याच्या बातम्याही येऊन गेल्या आहेत.
गणरायाच्या नैवेद्यासाठी जे पदार्थ तयार करायचे त्याची सामग्रीही यंदा जीएसटीच्या कचाट्यात सापडलेली आहे. खुद्द बाप्पांच्या मूर्तीही बऱ्याच महागल्याची स्थिती आहे. अशा अवस्थेतही गणरायाचे यंदा जल्लोषात स्वागत होणार असे एकूण लक्षण आहे. एकतर सार्वजनिक गणेश मंडळाची यंदा मोठीच धूम अनुभवायला मिळणार आहे. पुण्यात महिनाभर आधीच ढोलताशांचा सराव सुरू होतो. त्यातून अनेक कटकटी उद्भवतात. लोकांना या दणदणाटाचा मोठाच त्रास होतो. त्यातून ढोल-ताशा मंडळांवर अनेक प्रकारचे निर्बंध लागू केले जातात. यातूनच मग या मंडळांच्या मागे परवानग्यांचे लचांडही लावण्यात आले आहे. यातूनही मार्ग काढत मुलांनी यंदा महिनाभर आधीच मनसोक्त ढोल बडवणूक केली. आता गणपती मंडळांचे मांडव पडले असल्याने या रिकाम्या मंडळांच्या जागांवरही ढोलताशांची प्रॅक्टिस सुरू झाली.
पुण्यात कोणत्याही रस्त्यावरून सायंकाळी ये-जा करताना ढोल-ताशांचे आवाज कानी घुमतात. त्यातून एक वेगळीच वातावरण निर्मिती होत असते. याचाही आनंद घेण्याची क्षमता आपण आपल्या अंगी बाणवली पाहिजे, अशी अपेक्षा असते पण बऱ्याच जणांना ही कटकट वाटते, पण त्याला काही पर्याय नाही. शेवटी हा सार्वजनिक उत्सव आहे, त्यात वाद्यांचा जोष असलाच पाहिजे. नाही तरी म्हटलेच आहे की, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा!. त्यामुळे या हलकल्लोळाला पर्याय नाही. यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणे निर्बंध मुक्त असणार आहे. राज्यातल्या नव्या सरकारने तशा सूचना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांना कमीत कमी त्रास होईल असे पाहा अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते मंडळी खूश दिसताहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पोलिसांकडून त्यांच्यावर सूचनांचा भडिमार केला जातो. पण यावेळेला त्यांच्यावर सुचनांचा भडिमार करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा पोलिसांचा कल दिसला. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा जरा सुखद प्रकार होता. सार्वजनिक उत्सव सभ्यतेने आणि शिस्तीत पार पडला पाहिजे. त्यात जनजागृतीवर आणि पर्यावरणाच्या रक्षणावर भर असला पाहिजे अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते. ती अपेक्षा याही वेळी पूर्ण होईलच पण निर्बंधांच्या जोखडात सापडणाऱ्या सार्वजनिक मंडळांना यंदा जरा बऱ्यापैकी मोकळीक मिळणार असल्याने त्यांचाही उत्साह सध्या जोरात दिसतो आहे.
सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या अशा स्वरूपाच्या उत्सवामुळे तरुणाईच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडते आणि आणि हा युवक वर्ग मग जरा मोकळा होतो असे एक मानसशास्त्र आहे असे म्हणतात. त्या अर्थाने यंदा या युवावर्गाला सरकारच्या धोरणामुळे बऱ्यापैकी मोकळीक लाभणार आहे. यंदा पाच दिवस लाऊडस्पीकरचीही रात्री बारापर्यंत अनुमती असणार आहे. त्यामुळे रात्री दहाच्या बंदीच्या धास्तीने पुण्यात अलीकडच्या काळात रात्री उशिरापर्यंत दिसणारी रस्त्यावरची गर्दी कमीकमी होत चाललेली दिसत होती. यंदा रात्री उशिरापर्यंत ही गर्दी रस्त्यावर दिसण्याची शक्यता आहे. यंदा वर्गणीसाठी फार जोरजबरदस्ती झाल्याचेही ऐकिवात आलेले नाही. अनेक मंडळांनी वर्गणी गोळा करण्यापेक्षा जाहिरातींच्या कमानी उभारून पैशाची सोय केलेली दिसते आहे. मध्य पुणे संपूर्णपणे अशा जाहिरातींच्या कमानीने सजले आहे. अनेक मंडळांनी आपल्या मुख्य मंडपापासून लांब अंतरापर्यंत या कमानींची उभारणी केल्याचे सध्या दिसते आहे. यंदा काही मंडळांनी प्रत्यक्ष गणेश स्थापना दिनाच्या आधीच मिरवणुका काढून आपल्या श्रींना मंडपात नेल्याचाही प्रकार दिसला. बहुधा त्यांना आरास करताना मूर्ती आधीच मुख्य ठिकाणी बसवणे सोयीचे ठरणार असावे. अन्यथा असा प्रकार विरळाच. पुण्याबरोबरच राज्यातल्या अन्यही शहरांमध्ये सार्वजनिक मंडळांनी जोरदार तयारी केल्याच्या बातम्या आल्या आहेत. जवळपास प्रत्येक घरातच बुधवारी श्रींचे आगमन होणार आहे.
आपल्या दैनंदिन अडचणी आणि रडकथांना दूर सारून अबालवृद्ध मंडळी श्रींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करून बसली आहेत. दोन वर्षांच्या करोनाच्या काळातील दैन्य, दुःख आणि टंचाईचे सावट यावेळी काहीसे दूर झाल्याने बाजारातही जरा चलती दिसते आहे. बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या खरेदीचा जोर वाढला आहे. अगदी मोठ्या खर्चाच्या फ्लॅट खरेदीचेही प्रमाण यंदा बरेच वाढले असल्याचेही दिसले आहे. मधल्या काळात खरेदीअभावी हे सगळेच व्यवसाय मरगळले होते. शेवटी उत्सव म्हणजे तरी नेमके काय असते, श्रींकडे भरभराटीच्या मागणीची एक संधी असते, त्यांच्या आगमनाने सर्वत्र शुभशकुन होईल, इच्छाआकांशा पूर्ण होतील आणि अंधारातल्या लोकांना नवा प्रकाश दिसेल अशीच भावना या मागे असते. यंदाच्या श्रींच्या आगमनाने यातला हेतू बऱ्याच अंशी साध्य झाल्याचे वातावरण आहे. हे वातावरण यापुढील काळात असेच बहरते राहो आणि श्रींचे आगमन खऱ्या अर्थाने सुखदायक होवो हीच प्रार्थना आपण सगळेच जण उद्या त्यांच्याकडे करणार आहोत.