-प्रा. दिलीप येवलेकर
प्रकट चिंतनातून प्रेरणा देणारे, असंख्य पीएच.डी. विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान, प्रवर्तक असे ऋषितूल्य प्र. चिं. शेजवलकर यांचे नुकतेच निधन झाले. त्याबाबत…
1970-75 या सालापर्यंत आर्टस, सायन्स, कॉमर्स ह्या पारंपरिक अभ्यासक्रमांचा काळ होता. औद्योगिक क्रांतीचा वाढणारा वेग. कुशल मनुष्यबळाची गरज, यंत्र आणि तंत्र यांची सांगड घालण्याची गरज ओळखून डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी नाशिकमध्ये एका महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले. कला, वाणिज्य यांचा सुरेख संगम साधून व्यवसायातील विविध क्षेत्रांत आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासक्रमाची जोड दिली.
“व्यवस्थापना’चे सर्व क्षेत्रांतील महत्त्व ओळखून उत्पादन, हिशेब, विक्री, विपणन, वाहतूक, शेती अशा अनेक क्षेत्रांत अभ्यास, निरीक्षण, अनुभव यांची सांगड घातली. कालची चैन, आजची फॅशन, उद्याची गरज असते हे ओळखून पाश्चिमात्य व्यवस्थापनातील विचारवंताचे सिद्धांत भारतीय व्यवस्थापन, संस्कृती, भौगोलिक आणि गरजा लक्षात घेऊन इंग्रजीप्रमाणेच मराठीतही तितक्याच समर्थपणे सहजपणे ग्रंथ निर्मिती केलीच आणि इंग्रजीप्रमाणेच मराठीही समृद्ध, ज्ञानभाषा आहे सिद्ध केले. प्रकट चिंतन आणि प्रदीर्घ अनुभव यातूनच त्यांच्या विचारांतून, परिसंवादातून, व्याख्यांनातून, ग्रंथांतून एक वेगळी दिशा मिळते यात शंकाच नाही.
गेल्या 50 वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनातून, प्रेरणेतून व्याख्याते, लेखक निर्माण झाले. इंग्रजीचे अवडंबर आणि तथाकथित भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी मराठीत इतकी सहज, सुलभ सिद्धांत मांडणी केली, म्हणूनच त्यांना क्रांतिकारक म्हणणे आवश्यक वाटते. मराठीतील आधुनिक वाल्मिकी गदिमांची जी प्रतिभा आहे तीच चपखलता, अचूकता सरांनी साधली. “झुमका गिरा रे!’ या हिंदी गाण्याचे रूपांतर गदिमांनी “बुगडी माझी सांडली गं’ जितक्या सहज सुंदरतेने केले आहे अगदी तसेच शेजवलकर यांनी फिलीप्स क्रोथ्लस, पीटर ड्रकर, हेआंग इ. पाश्चिमात्य विचारवंतांचे सिद्धांत, विचार विशद केले आहे. जगात नवीन काहीच नसते, नवीन कधीच नवीन राहत नाही, पण काळाप्रमाणे, गरजेप्रमाणे नावीन्यपूर्ण मांडणी करण्याची हातोटी आणि सचोटी त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसते. श्रद्धेशिवाय ज्ञान नाही, असे ठामपणे सांगतानाच ते सकारात्मक विचारांची सुरुवात करतात आणि सहजपणे सिद्धांतांची सिद्धता करतात.
उद्दिष्टपूर्ती या विषयांवर बोलताना शेजवलकर उद्दिष्ट कसे असावे, याबाबत म्हणतात, “आपल्याला दोन कान आहेत. ऐकण्याची क्रिया एक आहे. दोन डोळे पण दृष्टी एक. दोन पाय पण चालण्याची दिशा एक. त्याप्रमाणे आपले उद्दिष्ट दृढ, एकच कसे असावे यासाठी सातत्य, गुणवत्ता, ध्यास, समर्पण अशा अनेक गोष्टी म्हणजे उद्दिष्टपूर्ती वाटचाल. एखाद्या हिऱ्याच्या पैलूतून प्रत्येक किरण वेगवेगळा येतो आणि असंख्य किरणं डोळे दीपवून टाकतात तसेच शेजवलकर सरांचे मार्गदर्शन, वैचारिक बैठक, अध्यात्मिक बैठक आणि प्रेरणा यांच्यातून सिद्धी आणि प्रसिद्धीतला फरक कळू लागतो.
माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थी, उद्योजक, प्राध्यापक, विचारवंत यांचे दीपस्तंभ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांना अभिवादन.