– ह.भ.प. नारायण म. डमाळे शास्त्री
संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ।।
हरिपाठातील आठव्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, आपल्या मनोवृत्तीची धाव संतांच्या संगतीकडे लावावी आणि या साधनाने लक्ष्मीपतीस वश करून घ्यावे. म्हणजेच संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर घेऊन देहाने व मनाने तसे वागावे. हरिला वश करून घेण्याचे हेच साधन होय.
वाचेने निरंतर रामकृष्ण नामाचा जप करणे हाच जीवाचा धर्म होय. रामजप हा शिवाचाही आत्मा आहे. अर्थात, जीवाने त्याचे भजन करणे आवश्यक आहे. एक तत्त्व जो हरि त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात, त्यांना “मी’ आणि “तू’ इत्यादी बंधनाची बाधा होत नाही.