अर्णव गोस्वामी नावाच्या एका इंग्रजी पत्रकाराने राष्ट्रप्रेमाचा जो बेगडी बाजार इतके दिवस मांडला होता, त्याची सारी पोलखोल मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. या पत्रकाराचे जवळचे मित्र आणि बीएआरसी या टीआरपी रेटिंग ठरवणाऱ्या संस्थेचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांच्याशी अर्णव यांचा व्हॉट्सऍपवरून जो संवाद झाला आहे त्याची पाचशे पानांची ट्रान्सक्रीप्ट सध्या जोरात व्हायरल झाली असून त्यातून ही पोलखोल झाली आहे. दुसऱ्या माध्यमांना आणि पत्रकारांना सतत ल्युटेन्स मीडिया किंवा दलाल पत्रकार म्हणून हिणवणारा माणूसच सत्ताधाऱ्यांचा दलाल निघाला आहे, असा निष्कर्ष यातून सहज काढता येतो. या संवादाचा जो तपशील हाती आला आहे, तो चक्रावून टाकणारा आहे.
रोज रात्री नऊच्या शोमध्ये आक्रस्ताळेपणाने विरोधकांवर तुटून पडणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांचीच पाठराखण करणाऱ्या अर्णव यांनी प्रसार माध्यमे आणि पत्रकारिता याची सारी परिमाणेच बदलून टाकली आहेत. पण ही सारी ढोंगबाजीच होती हे जेव्हा पुराव्यानिशी उघड होते त्यावेळी मात्र कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. यातील काही मुद्दे खरोखरच गंभीर आहेत. संरक्षणविषयक ज्या बाबी केंद्रातील मंत्र्यांना सुद्धा माहिती नसतात त्या बाबी अर्णव गोस्वामी यांना आधीच कशा कळत होत्या, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. याची रितसर चौकशी होण्याची गरज आहे. बालाकोट येथे झालेला हवाई हल्ला हे लष्कराचे अत्यंत महत्त्वाचे गुपित अर्णव यांना तीन दिवस आधीच माहिती होते, हे या संवादातून स्पष्ट झाले आहे. काही तरी मोठे होणार आहे, ते काश्मीरच्या भूमीवर असणार आहे, आणि पाकिस्तानवर यातून कारवाई केली जाणार आहे, असे तपशील त्यांनी पार्थो दासगुप्ता यांना बालाकोट हवाई हल्ल्याच्या अनुषंगाने तीन दिवस आधीच दिले आहेत.
संरक्षण दलातील या महत्त्वाच्या बाबी विशिष्ट पत्रकारापर्यंत पोहोचल्याच कशा, याचे उत्तर आता संरक्षण मंत्र्यांनीच देणे गरजेचे आहे. राष्ट्रवाद आणि देशप्रेम याचे घाऊक कंत्राट आपण एकट्यानेच मिळवले आहे, अशा थाटात आपल्या टीव्ही चॅनेलवरून प्रकटणारा हा पत्रकार पुलवामातील हल्ल्यात आपले चाळीस जवान शहीद झाल्याच्या घटनेवर जल्लोषी प्रतिक्रिया देतो ही बाब अधिक वेदनादायी आहे. आपण आता वेड्यासारखे जिंकणार आहोत असे ते या संवादात एकेठिकाणी म्हणाले आहेत. केंद्रातील सर्व मंत्री आपल्याच बरोबर आहेत हे त्यांचे यातले विधानही सगळ्याच बाबी स्पष्ट करणारे आहे. यात पीएम, पीएमओ, आणि एएस अशा संज्ञा वापरूनही अनेक बाबींचा ऊहापोह झाला आहे. हे सगळेच तपशील सामान्य माणसाला चक्रावून टाकणारे ठरले आहेत. आपल्याला इतके दिवस केवळ ठरवून मूर्ख बनवले जात होते, हे आता सामान्य माणसाला या साऱ्या प्रकारातून स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे व्हॉट्सऍप चॅटिंग खोटे किंवा बनावट असण्याची सूतराम शक्यता नाही, कारण पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा जो मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे त्याच मोबाइलच्या बॅकअपमधून हा सारा मामला समोर आला आहे.
टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीतून हे गुपित उघड झाले आहे. पार्थो दासगुप्ता हे सन 2013 ते 2019 या काळात बीएआरसी संस्थेचे सीईओ म्हणून काम करीत होते. ही संस्था देशातील सर्व प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्यांचे टीआरपी मोजण्याचे काम करते. टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइन्ट्स. यावरून कोणती वाहिनी किती लोक पाहतात आणि कोणता कार्यक्रम दर्शकांच्या किती पसंतीस उतरतो हे स्पष्ट होते. या टीआरपी रेटिंगवर जाहिरातींचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय अवलंबून असतो. अर्णव यांनी आपल्या रिपब्लिक टीव्हीचे टीआरपी रेटिंग पाइन्टस बनावट मार्गाने वाढवले आणि त्यासाठी त्यांनी पार्थो दासगुप्ता यांच्याशी संगनमत केले याचे सज्जड पुरावेच आता पोलिसांच्या हाती आले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना 29 जानेवारीपर्यंत कोणत्याही कारवाईपासून संरक्षण दिले आहे. तथापि त्यानंतर मात्र गोस्वामी यांची वाट बिकटच दिसते आहे. या पत्रकाराने त्याला हवे ते विषय राष्ट्रीय पातळीवरून मनमानी पद्धतीने गाजवले होते.
सुशांतसिंह या अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणापासून ते पालघरच्या मॉब लिंचींग प्रकरणापर्यंत अनेक प्रकरणात त्यांनी सत्ताधारी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेत पत्रकारितेचा बाजार मांडल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत होता. त्यात तथ्य होते हे यातून दिसून आले आहे. प्रसार माध्यमांवरील सामान्य जनतेचा विश्वासच उडून जाण्याचा धोका अशा प्रकरणातून उद्भवतो त्यामुळे हा मामला अधिक गंभीर ठरतो. प्रसार माध्यमे निष्पक्ष असावीत, ती लोकांचे प्रश्न धसास लावणारी असावीत, सरकारवर अंकुश ठेवणारी असावीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे सत्य आहे ते त्याच स्वरूपात लोकांपुढे मांडणारी असावीत अशी सामान्यांची अपेक्षा असते. याच अपेक्षेने सामान्य माणूस हा प्रसार माध्यमांमधून त्याला जे दिसते ते खरेच मानून चालत असतो. पण या माध्यमांमधून आपल्या समोर जे येते ते पूर्वनियोजित आणि ठरवून केलेले असते, असे जेव्हा त्यांच्या लक्षात येते त्यावेळी त्यांना धक्का बसल्याशिवाय राहत नाही. प्रसार माध्यमांची इतकी अभूतपूर्व घसरण यापूर्वीच्या काळात झालेली दिसली नव्हती.
शेवटी प्रसारमाध्यमे हा खासगीच व्यवसाय असतो आणि त्यात व्यवसायाची गणित सांभाळावीच लागतात ही सामान्य बाब आहे. पण व्यवसाय करणे म्हणजे स्वत:ची इभ्रतच विकणे नव्हे हे आता या माध्यम सम्राटांना नीट समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. वृत्तवाहिनीवाल्यांनी मांडलेल्या लोकशाहीच्या खुल्या बाजारावर आता प्रभावी अंकुश लावण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. अर्णव गोस्वामी प्रकरण हे सध्याच्या प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आता ऐवीतेवी ते उघड झालेच आहे तर त्या प्रकरणातील कारवाई लॉजिकल एंडपर्यंत धसास लावणे ही काळाची गरज आहे. पण केंद्र सरकारचेच पाठबळ असलेल्या या माध्यम सम्राटावर खरेच किती निष्पक्ष कारवाई होईल याचीही शंका आहे. असे म्हणतात की, राष्ट्रवाद हे बदमाश लोकांचे शेवटचे अस्त्र असते. अर्णव यांच्या उघड झालेल्या चॅटिंगमुळे ते दुर्दैवाने खरे ठरले आहे याचे वैष्यम्य वाटल्या खेरीज राहात नाही.