हैदराबादला 2019 मध्ये झालेल्या सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार संशयितांचा पोलिसांनी केलेला “एन्काउंटर’ बनावट होता, असा अहवाल चकमकीचा तपास करणाऱ्या आयोगानं नुकताच दिला. त्यानंतर काही दिवसांतच हैदराबादमध्ये सामूहिक अत्याचाराची आणखी एक घटना घडली आणि पुन्हा एकदा चिंता व्यक्त करणाऱ्या चर्चा सुरू झाल्या. “असे गुन्हे करण्याची मानसिकता अखेर येते कुठून,’ अशा वैचारिक मंथनापासून “अशा नराधमांना ताबडतोब फाशी द्यायला पाहिजे,’ अशा आक्रस्ताळी वक्तव्यांपर्यंत सगळं काही पुन्हा सुरू झालं.
पुन्हा एकदा दिल्लीच्या “निर्भया’च्या आठवणी काढल्या गेल्या. आपल्याकडे खटल्यांना विलंब कसा होतो, मग “तत्काळ न्याया’ची मानसिकता कशी तयार होते, त्यातूनच “एन्काउंटर’ कसे होतात वगैरे चर्चा होऊ लागल्या. हैदराबादमध्ये 2019 मध्ये जेव्हा एन्काउंटर झाला होता, तेव्हा नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांच्या भावना सोशल मीडियावरून कशा वाहिल्या होत्या हे आपण पाहिलंच. परंतु आज तीन वर्षांनंतर समस्या जिथल्या तिथं आहे आणि एन्काउंटरवरही संशय आहे. त्याच वेळी मुंबईच्या साकीनाकाजवळ झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला न्यायालयानं नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका वाहनात ही घटना घडली होती. म्हणजे, दरवेळीच न्यायाला विलंब होतो हेही खरं नव्हे. अशा घटनांवर जेवढी चर्चा होते, तेवढी त्यांच्या कारणांवर होत नाही, हे मात्र खरं!
वेगवेगळ्या घटना अशा एकाच वेळी समोर असताना योगायोगानं एका जाहिरातीवर सध्या जोरजोरात चर्चा सुरू आहे. उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक जाहिराती वेळोवेळी चर्चेत राहिल्या, राहतात आणि राहतीलही; परंतु एखादी जाहिरात सामूहिक अत्याचाराच्या घटनांना प्रोत्साहन देणारी असल्याचा थेट आक्षेप पहिल्यांदाच घेतला गेला असावा. विशेष म्हणजे, सोशल मीडियाचे यूजर या जाहिरातीवर तुटून पडल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही जाहिरात सगळ्याच माध्यमांवरून हटवण्याचे आदेश दिले. जाहिरात आहे बॉडी स्प्रेची.
आत्यंतिक दर्जाहीन असे शाब्दिक विनोद आणि द्विअर्थी संवादांनी ही जाहिरात खूपच भडक झालीय. एक मुलगी आणि चार-पाच मुलं या जाहिरातीत दिसतात. याच सेटअपमध्ये दोन वेगवेगळ्या जाहिराती चित्रित केल्यात. ही दर्जाहीनता हल्ली बरीच वाढत चाललीये आणि अशी दर्जाहीन दृश्यं दाखवण्याचं धाडससुद्धा! विशिष्ट जाहिराती चारचौघात किंवा कुटुंबीयांसमवेत बघणं कसं जिवावर येतं, यावर काही वर्षांपूर्वी चर्चा चालायची. पण केलं कुणीच काही नाही. हळूहळू आपणच सर्वांसमक्ष अशा जाहिराती बघणं अंगवळणी पाडून घेतलं. थोडक्यात आपणच कोडगे झालो. मग जाहिराती तयार करणाऱ्यांचं धाडस आणखी वाढलं. आज कितीतरी जाहिराती खरोखर लज्जास्पद असूनसुद्धा आपल्याला सवयीच्या होऊन गेल्यात.
बारकाईनं धांडोळा घेतल्यावर आपल्याला असं दिसतं, की बाजारवादी संरचना स्वीकारल्यापासून आपल्यावर कंपन्यांनी चहूबाजूंनी “कलमं’ करायला सुरुवात केली. गरजेप्रमाणं वस्तू बनवण्याऐवजी तयार केलेल्या वस्तूची गरज निर्माण करणं सुरू झालं. या धामधुमीत मूल्यव्यवस्था बदलणं अपरिहार्य होतं. मुळातल्या संस्कृतीवर केलेली ही “कलमं’ चांगलीच तरारली… मुळं मात्र हादरली! आपल्या इच्छा-आकांक्षा, कामना खेचून बाहेर काढल्या गेल्या. याच “कलमां’ना लागलेली ही विषारी फळं आहेत, हे स्वीकारण्याचं धाडस आपल्यात आहे?