नवमहाराष्ट्र राज्यात मुंबई शहराचे महत्त्व वाढेल
मुंबई, ता. 24 – “भारताचे प्रवेशद्वार म्हणून ज्याचे यथायोग्य वर्णन करण्यात येते त्या मुंबई शहराचे महत्त्व आजच्या सारखेच पुढेही टिकवले जाईल. नव्या महाराष्ट्रात त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. मुंबईने राज्याचे समृद्धीस मोठा हातभार लावला असून, उद्योग-व्यापार-संस्कृतीत मुंबईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व धर्मी म्हणून या शहराची ख्याती आहे. म्हणून हे स्थान टिकवून मुंबईच्या भरभराटीकडे विशेष लक्ष पुरविण्याची नव महाराष्ट्राची खटपट राहील’, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज आश्वासन दिले.
सीमा कमिशन नेमा
नवी दिल्ली – निव्वळ भाषिक तत्त्वावर विविध राज्यांच्या सीमा आखणी करण्यासाठी सीमा कमिशन नेमा अशी मागणी महागुजराथ परिषदेचे नेते याज्ञिक यांनी आज लोकसभेत केली. राज्यपुनर्रचनेनंतरही विशिष्ट भाषिक प्रदेश ती भाषा नसणाऱ्या राज्यात समाविष्ट असल्याची उदाहरणे आहेत.
भारत-पाकच्या अर्थविषयक वाटाघाटी आज सुरू होणार
रावळपिंडी – भारताचे अर्थमंत्री मोरारजी देसाई आज दुपारी येथे कराचीहून आले असून भारत-पाक दरम्यानच्या आर्थिक प्रश्नासंबंधी पाक अर्थमंत्र्यांशी त्यांच्या वाटाघाटी व्हायच्या आहेत. भारत-पाकचे स्नेहसंबंध निकटचे होण्याची जरूरी प्रतिपादन करताना ते म्हणाले, अशा मैत्रीवरच उभय राष्ट्रांची प्रगती-उत्कर्ष अवलंबून आहे. जुने गैरसमज काढून टाकून स्नेहाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. आपले वाद असले तर प्रथम स्नेहभावनाच वाढवली पाहिजे. कारण वाद मिटतात ते वाटाघाटीनेच.
राजस्थानात लिग्नाइटचे प्रचंड साठे आढळले
नवी दिल्ली – राजस्थानातील बिकानेरच्या पलाना भागात लिग्नाइटचे (करड्या रंगाचा कोळसा) आणखी 80 लाख टनांचे साठे असल्याचे आढळले, अशी माहिती खाणमंत्र्यांनी लोकसभेत दिली.