– अरुण गोखले
अशाच एका ग्रंथ पारायण सप्ताहाच्या निमित्याने ग्रंथांचे पारायण, वाचन हे का करायचे हे सांगताना प. पू. ज्ञाननाथजी रानडे म्हणाले की “बाबांनो! ग्रंथ हे आपण वाचण्यासाठी वाचायचे असतात’. त्यांचे उत्तर थोडेसे मजेशीर वाटले खरे, पण जेव्हा त्यांनी त्याची खरी फोड करून सांगितली तेव्हा “वाचण्यासाठी वाचायची’ ह्या बोधा मागचा खरा अर्थ उमगला.
ते म्हणाले, “हे पाहा, आपण प्रवास करीत असताना घाटात लिहिलेल्या “सावधान! धोक्याचे वळण आहे, वाहने सावकाश चालवा’ ही सूचना वाचतो. रस्ता ओलांडताना “थांबा, डावी उजवीकडे पाहा, मग जा’ ही सूचना वाचतो. औषधाच्या बाटलीवरील सूचना वाचतो. का? तर आपल्याला आपला बहुमोल जीव हा धोक्यात घालायचा नसतो म्हणून, होय ना?
तसंच जीवन जगत असतानाही त्यात निर्माण होणारे संघर्ष कसे सोडवायचे, कुठे कसे सतर्क राहायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही. इतकेच नव्हे तर आपण आपल्या संसार प्रपंच्यातही सुखी समाधानी होण्यासाठी काय करावे हे शिकण्यासाठी आपण ग्रंथांचे वाचन करायचे असते. श्री ज्ञानेश्वरी हे गीतेवरचे भाष्य आहे. गीता ही जीवाला सुखाची जीवन विद्या शिकविणारी आहे. दासबोध हा प्रपंच आणि परमार्थाचा मार्गदर्शक आहे. रामायण आपल्याला आदर्शांचा पाठ देणारा तर महाभारत जीवनकलहापासून दूर राहा हे सांगणारा आहे.
आपलाही अनेक बाबतीत भावनिक संघर्ष चालूच असतो. कधी तो परिस्थितीशी असेल, कधी व्यक्तींशी असेल तर कधी आपल्याच भाव भावनांशी. त्या संघर्षाच्या वेळी आपलीही अवस्थाही त्या मोहित, संभ्रमित झालेल्या अर्जुनासारखीच असते. आपणही हे करावे का करू नये, काय करायचं, काय करायचं नाही. काय चांगल काय वाईट, काय खरं आणि काय खोट? हे ठरवताना आपणही चक्रावून जात असतो. आपली विवेकबुद्धीही काम करत नाही. त्यावेळी आपल्यालाही श्रीकृष्णासारखा खरा उद्धारक मार्गदर्शक हवा असतो. पण
त्या अर्जुनास श्रीकृष्ण मार्गदर्शक लाभला, कारण तो तेवढा भाग्यवान होता. आपण तेवढे भाग्यवान नाही. मग ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मार्गदर्शन कोण करणार? त्याचं उत्तर एकच असते आणि ते म्हणजे ग्रंथ, आणि म्हणूनच जीवन संग्रामात वाचण्यासाठी हे मार्गदर्शक ग्रंथ वाचायचे असतात.