सगळ्या राजकीय पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठीची लगबग सुरू असताना महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात मात्र कमालीची शांतता होती. त्यामुळे या गडबडीत राज ठाकरे यांचा पक्ष काय निर्णय घेणार या विषयी राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. तशातच आज राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्याची भेट घेतल्याची बातमी आली.
राज ठाकरे यांची आता महाराष्ट्रातील महायुतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याच्या बातम्याही लगोलग यायला लागल्या. अजून त्या बाबतचे अंतिम धोरण स्पष्ट झालेले नसले तरी सारा रागरंग राज ठाकरे हे महायुतीच्या दिशेनेच निघाल्याचा आहे. त्यांचा भाजपला किंवा त्यांच्या महायुतीला मोठा प्रासंगिक लाभ होऊ शकतो, कारण उद्धव ठाकरे यांचा झंझावात रोखण्यासाठी त्यांना राज ठाकरे उपयोगी पडू शकतात हे बहुतांशी खरे आहे. पण महायुतीत जाऊन राज ठाकरे यांच्या पदरात काय पडणार हा मात्र एक मोठा प्रश्न आहे.
मुळात महायुतीत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप हे तीन मोठे पक्ष असताना त्यांना या चौथ्या पार्टनरची गरजच का भासली हा प्रमुख प्रश्न आहे. याचा अर्थ सरळ आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जो झंझावात निर्माण केला आहे त्यांना रोखणारा प्रभावी नेता महायुतीकडे नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला रोखण्याच्या कामात फारसा उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानेच बहुधा आयत्यावेळी या चौथ्या पार्टनरला घेण्याचा प्रयत्न भाजपने चालवला असावा असा याचा अर्थ निघू शकतो. पण आणखी एका मोठ्या पक्षाला आपल्यात ओढून महायुतीत किती खिचडी होणार आहे याचा हिशेब भाजपच्या नेतृत्वाने लावला आहे काय, हा यातला मुख्य प्रश्न आहे.
मुळात आधीच्या तीन पक्षांतील जागावाटपाचा तिढा कायम असताना आता पुन्हा मनसेला आपल्यात घेऊन त्यांना नेमक्या किती जागा दिल्या जाणार आहेत हाही प्रश्न आहेच. काही जणांच्या म्हणण्यानुसार केवळ एक-दोन जागा देऊन मनसेची बोळवण केली जाईल. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मात्र राज ठाकरेंचा भाजपला उपयोग होऊ शकतो त्यासाठीचा हा गेम प्लॅन असावा. मुंबई महापालिका जिंकण्याला भाजपचे सर्वोच्च प्राधान्य आहे, त्यासाठीची ही योजना असेल तर केवळ तेवढ्यावर मनसे मर्यादित राहू इच्छिते काय हेही पहावे लागेल.
मनसेपुढे आज अस्तित्वाचा प्रश्न आहे. अशा अवघड स्थितीत एकटे राहून पुन्हा पराभवाचा सामना करण्यापेक्षा स्पर्धेत राहून आपले अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे असा विचार राज ठाकरेंनी केला असण्याची शक्यता अधिक आहे. वास्तविक राज ठाकरे यांच्या पक्षाला पहिल्यापासूनच धोरणाने निर्णय घेणे कधी जमलेच नाही. ज्यावेळी शिवसेना भाजपपासून दूर झाली त्याचवेळी राज ठाकरे यांनी भाजपशी युती केली असती तर त्यांना त्याचा मोठा लाभ झाला असता. पण नेमक्या त्या काळात राज ठाकरे मोदींच्या विरोधात भाषणे करीत सभा गाजवत राहिले. त्यातून त्यांना काहीच लाभ होणार नव्हता. पण त्यांच्या भाषणांनी वातावरण ढवळून निघाले होते. हीच भाजप विरोधातील भूमिका त्यांनी कायम ठेवली असती आणि ते राजकारणात सतत सक्रिय राहिले असते तर राज ठाकरे यांना महाराष्ट्रात स्वतःची मोठी स्पेस निर्माण करता येणे शक्य होते. पण तो महत्त्वाचा काळ त्यांनी हातून गमावला. आताही ते भाजपवर नाव न घेता टीकाच करीत राहिले होते.
‘दुसर्याची पोरे किती दिवस कडेवर घेणार’, असा सवाल ते करीत राहिले. त्यावरून ते अजूनही भाजपच्या विरोधातच लढण्याच्या मनस्थितीत आहेत असे वाटत होते, पण आता बहुधा ते स्वतःच भाजपच्या कडेवर जाण्यास उत्सुक आहेत असे दिसते आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनाच त्यांची ही भूमिका कितपत पटेल या विषयीही शंका आहे. तीन मोठ्या पक्षांच्या वळचणीला जाऊन आपले अस्तित्व आणखी आक्रसून घेणे बहुधा मनसेच्या समर्थकांनाच पटणारे नसेल. त्यातही आणखी एक महत्त्वाची अडचण भाजपची होणार आहे. कारण मुंबई व महाराष्ट्रातील बिहारी व यूपीच्या लोकांच्या विरोधात आक्रस्ताळी भूमिका घेणार्या राज ठाकरेंबरोबरच भाजपने युती केल्यानंतर त्याविषयी भाजपच्या विरोधात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये विरोधी पक्ष जोरदार आवाज उठवून भाजपची गोची करण्याचा निश्चित प्रयत्न करणार हे नक्की.
त्यावेळी भाजपला हे राज ठाकरे प्रकरण उत्तर प्रदेश आणि बिहारच्या प्रचारात अडचणीचे ठरू शकते हा मुद्दा आज भाजप नेतृत्वाच्या लक्षात आलेला नसावा; पण काँग्रेस, राजद आणि समाजवादी पक्षाचे लोक या मुद्द्याचे त्या दोन राज्यांमध्ये भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकुणातच हे महायुतीचे चार पक्षांचे खिचडी समीकरण नीट जुळणारे नाही. अर्थात, भाजपचे लोक केवळ प्रयोग म्हणून याकडे पाहतील, जर अपेक्षित निकाल आला नाही तर ते मनसेला झुरळ झटकल्यासारखे झटकू शकतील.
आजच भाजपने पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्षाला दूर झटकून पुन्हा चिराग पासवान यांच्याबरोबर युती केली आहे. गरजेपुरते एखाद्या पक्षाला जवळ करायचे आणि नंतर निर्दयीपणे त्यांना झटकायचे हेच भाजपचे आजवरचे धोरण राहिले आहे. त्याचा मनसेला भविष्यात फटका बसू शकतो, हेही त्यांनी ध्यानात ठेवलेले बरे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळा पोरखेळ पाहून जनताच वैतागली आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आपल्या वैचारिकतेवर टिकून असायचे. पण त्यात ही घाऊक पद्धतीची फोडाफोडी झाली आहे त्यातून राजकारणाचा एकूणच पोत बिघडला आहे आणि त्याचा मोठा ठपका भाजपवर जातो आहे.
अर्थात, असल्या वैचारिक मुद्द्यांना फार महत्त्व देण्याच्या ते मनस्थितीत नसतात. भाजपला फक्त वेळ निभावून न्यायची असते आणि राजकीय दुकान लावायचे असते. पण त्यातून महाराष्ट्र नाहक पोळला गेला आहे. लोक हल्ली फार जुने हिशेब लक्षात ठेवून मतदान करीत असतात ही बाब सर्वांनीच ध्यानात ठेवलेली बरी.