नवी दिल्ली- रशिया- युक्रेन युद्धामुळे तेल आयातीवर परिणाम होऊन तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पुढील दोन महिने तरी भारतीय बाजारपेठेत खाद्य तेलाचा पुरवठा सुरळीत राहील अशी ग्वाही देशातील तेल उत्पादक आणि वितरक कंपन्यांनी दिली आहे.
भारत रशियातून आणि युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करतो. या दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही आयात होणार नाही असे समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी तेल उत्पादक आणि वितरकची बैठक घेतली.
खाद्य तेलाच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने दोन महिन्यापासून अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेलाचे दर सध्या कमी पातळीवर आहेत. गेल्या दोन दिवसापासून खाद्य तेलाच्या दरात घट होत असल्याची माहिती वितरकांनी सरकारला दिली. भारतामध्ये यावर्षी मोहरीचे पीक विक्रमी पातळीवर झाले आहे.
ही मोहरी बाजारामध्ये उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे मोहरीचे तेल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी गोयल यांना सांगितले की देशात सध्या सूर्यफूल तेलाचा अजिबात तुटवडा नाही. मार्च महिन्यामध्ये युक्रेनमधून दीड लाख सूर्यफूल तेल जहाजावर लादण्यात आले आहे. त्यावेळी युद्ध सुरू नव्हते. आता हे दीड लाख टन तेल लवकरच भारतीय बंदरामध्ये येणार आहे.
भारताला महिन्याला साधारणपणे 18 लाख टन तेल लागते. त्यामध्ये दीड ते दोन लाख टन सूर्यफुलाचे तेल असते. त्यामुळे दोन महिन्यात तरी भारताला सूर्यफुलाच्या तेलाची टंचाई भासणार नाही. सूर्यफुलाच्या तेलाऐवजी मोहरीचे तेल आणि सोयाबीनचे तेल वापरले जाऊ शकते. उत्तर भारतामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये त्यामुळे फारशी अडचण येणार नाही.
त्याचबरोबर लवकरच 11 लाख टन मोहरी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने तरी खाद्य तेलाची टंचाई भासणार नाही. या बैठकीला तेल उत्पादक संघटनेचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी, वनस्पती तेल उत्पादन संघटनेचे महासंचालक एस पी कामराह तसेच अदानी विल्मर, रूची सोया इत्यादी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.