लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपच्या मंत्रिमंडळातून मी राजीनामा दिल्याने त्या पक्षाला जबर धक्का बसला असून या पक्षात भूकंप झाल्या सारखी स्थिती निर्माण झाली आहे असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
मी सध्या केवळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे; भाजप अजून सोडलेला नाही असे त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले, तथापी आता माघार नाही आणि भाजप मध्ये राहण्याचा आपला विचार नाही असेही त्यांनी याच मुलाखतीत नमूद केले. समाजवादी पक्षात प्रवेश करण्याबाबतही आपण अजून निर्णय घेतलेला नाही. आपल्या अन्य सहकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत त्याविषयी आपण निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या बरोबरच भाजपच्या चार आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या बरोबर आणखी काही मंत्री आणि आमदार भाजपमधून लवकरच बाहेर पडतील असा दावा मौर्य यांनी केला आहे. मौर्य यांच्या बरोबर सध्या भाजपचे चार आमदार पक्षातून बाहेर गेले असले तरी आणखीही काही आमदार भाजप मधून बाहेर पडण्याच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुन्हा भाजप मध्ये जाण्याची आपली कितपत शक्यता आहे असे विचारता मौर्य यांनी म्हटले आहे की मी भाजपला नाकारले आहे त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा विषयच उपस्थित होत नाही. दरम्यान त्यांनी आपण येत्या 14 जानेवारी रोजी समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहोत असे एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
मौर्य आणि त्यांच्या बरोबर बाहेर पडलेले आमदार ओबीसी वर्गातील असल्याने भाजपच्या गोटात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केलेल्या आमदारांची व मंत्र्यांची भाजपकडून मनधरणी केली जात आहे असेही सांगण्यात येत आहे. आणखी जे आमदार भाजपमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे त्यांच्याशीही पक्षाच्या नेत्यांकडून बोलणे सुरू आहे.