पुणे – लॉकडाऊनमुळे राज्यात सुमारे 5 लाख 50 हजार जमिनीचे फेरफार प्रलंबित होते. महसुलमंत्री यांनी याविषयीचा आढावा घेताच मागील चार दिवसांत 70 हजार फेरफार निकाली निघाले. उर्वरित लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच राज्यातील ई-फेरफार प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सर्व विभागीय आयुक्त उपस्थित होते. त्यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे फेरफार प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला.
याकाळात प्रलंबित फेरफारांची संख्या वाढली. तसेच काही नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे कार्यालयात आणून दिली नाही. त्यावेळी या प्रक्रियेस विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महसुलमंत्री थोरात यांनी फेरफार लवकर निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्राधान्याने ही कामे पूर्ण करा, अशा सूचना दिल्या.
या सुचनेनुसार मागील चार दिवसांत 70 हजार फेरफार निकाली निघाले. यातील तीन दिवस सुट्टी असूनही तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून ही कामे पूर्ण करण्यात आली.