आबूधाबी – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने यशाच्या वाटेवरचा प्रवास सुरू केल्याचे रविवारी झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिसून आले होते. आता आज त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत असून त्यात पुन्हा अपेक्षेप्रमाणे चेन्नई विजय मिळवणार का कोलकाताला धक्का देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पंजाबने उभे केलेले द्विशतकी धावसंख्या चेन्नईने सहज पार केली व 10 गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात यापूर्वी सातत्याने अपयशी ठरलेला शेन वॉटसन भरात आला हीच चेन्नईसाठी जमेची बाजू ठरणार आहे. त्याचबरोबर फाफ डुप्लेसी यानेही नाबाद खेळी केल्याने चेन्नईला भक्कम सलामी मिळण्याची याही सामन्यात खात्री आहे.
संघात अंबाती रायडू परतल्याने त्यांची फलंदाजी जास्त भक्कम बनली आहे. त्यातही ड्वेन ब्राव्हो संघात परतल्याने त्यांना एक अव्वल अष्टपैलू खेळाडू मिळाला असल्याने त्यांच्या गोलंदाजीतही पर्याय उपलब्ध झाले आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मात्र, अद्याप सूर गवसला नसल्याने त्यांच्या गोटात चिंतेचे अद्याप वातावरण आहे. गोलंदाजीत पियुष चावला व दीपक चहर जरी बळी मिळवत असले तरीही ते अत्यंत महागडे ठरत आहेत. त्यातच सॅम कुरेन व शार्दुल ठाकूर यांना येत असलेले अपयश त्यांना सातत्याने अडचणीत आणत आहे. अशा स्थितीत मिचेल सॅन्टनर व जोश हेझलवूड यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जडेजाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह..
फलंदाजी व गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणाच्या जोरावर रवींद्र जडेजाने या स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यंदाच्या स्पर्धेत मात्र, त्याची कामगिरी दर्जाला साजेशी होत असल्याचे दिसून आलेले नाही. त्याने फलंदाजीत उपयुक्त खेळी केली आहे पण त्याला गोलंदाजीत प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुसरीकडे कोलकाता संघाला दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध विजय मिळवले असले तरीही त्यांना फलंदाजी व गोलंदाजीत अनेक प्रश्न सतावत आहेत. कर्णधार कार्तिकसह सुनील नरेन व आंद्रे रसेल यांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांची मधली फळी अत्यंत कमकुवत बनली आहे.
सलामीवीर शुभमन गील, नितीश राणा व इयान मॉर्गन या तीन फलंदाजांवरच त्यांची मुख्य मदार आहे. गोलंदाजीचा विचार केला नवोदित वेगवान द्वयी शिवम मावी व कमलेश नागरकोटी यांची कामगिरी चांगली होत असली तरी नरेन, रसेल, कुलदीप यादव यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. या स्थितीत लॉकी फर्ग्युसन व राहुल त्रिपाठी यांचा संघात समावेश करत गोलंदाजी अधिक सशक्त बनवण्याची शक्यता आहे.
या मैदानावरील खेळपट्टी अत्यंत कोरडी आहे. त्यामुळे येथे फलंदाजांसाठी ही खेळपट्टी म्हणजे जणू नंदनवनच ठरणार आहे. दोन्ही संघातील आक्रमक फलंदाजांची नावे पाहिली तर या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. खासकरून चेन्नईचा वॉटसन व कोलकाताचा रसेल यांच्यातच खरी जुगलबंदी रंगणार आहे.