छोटे व्यापारी आणि वर्क फ्रॉम होमवर परिणाम होणार
नवी दिल्ली : लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर केंद्र सरकारने ई- कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू या व्यासपीठावरून उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर वस्तूंच्या उत्पादकारोबरच ग्राहकावर परिणाम होऊ शकतो असे ई-कॉमर्स कंपन्यांनी म्हटले आहे.
लॉक डाऊनमुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीमध्ये घरातून काम करण्यासाठी आवश्यक फोन, संगणक आणि इतर उपकरणे असण्याची गरज निर्माण झाली आहे.
मात्र या वस्तू लॉक डाऊनमुळे दुकानातून उपलब्ध होत नाहीत. ई- कॉमर्सच्या माध्यमातून या वस्तू मिळण्याची शक्यता होती. ती सरकारने बंद केली आहे. त्यामुळे वर्क फॉर्म होमवर परिणाम होणार असल्याचे ई-कॉमर्स कंपन्यांनी म्हटले आहे. मात्र सरकारच्या सूचनांचे सर्व ई-कॉमर्स कंपन्या तंतोतंत पालन करतील असे या कंपन्यांनी म्हटले आहे.
सरकारने ज्या वस्तू ज्या पद्धतीने वितरीत कराव्या असे सांगितले आहे त्या वस्तू वितरित केल्या जातील. याबाबत ऍमेझॉन इंडिया या कंपनीने म्हटले आहे की, सरकारने योग्य तो निर्णय घेतला आहे असे गृहीत धरून आम्ही त्या नियमांचे पालन करीत आहोत. मात्र सरकारने अगोदर सर्व वस्तू या व्यासपीठावरून उपलब्ध उपलब्ध करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे बरेच उत्पादक, पुरवठादार यांनी यासाठी तयारी केली होती.
मात्र सरकारने ऐनवेळी आपल्या नियमांमध्ये बदल केला. या व्यासपीठावरून बऱ्याच छोट्या कंपन्यांची उत्पादने वितरित होत असतात. त्यांना सध्याच्या काळात खेळते भांडवल मिळण्यास मदत मिळाली असती. पेटीएम मॉल या कंपनीने सरकारला आवाहन केले आहे की लॅपटॉप, मोबाईल, फोन आणि इतर छोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकण्याची परवानगी द्यावी.
कारण या उपकरणाचा ग्राहकांना घरी बसून काम करण्यासाठी उपयोग होणार आहे. मात्र जीवनावश्यक नसलेल्या बाबी ई-कॉमर्स कंपन्यांना विकण्यास परवानगी दिल्यानंतर छोट्या दुकानदारांना अन्याय होऊ शकतो असे व्यापाऱ्यांच्या संघटनेने सरकारला सांगितले होते. ही विषमता दूर करण्यासाठी सरकारने आपल्या नियमांमध्ये बदल केला होता.