नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे जपानमध्ये 220 भारतीय अडकले असून त्यांनी आता आपल्याला मायदेशात घेऊन जाण्यासाठी काही व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांसाठी परदेशात गेलेल्यांना आता तेथेच अडकून रहावे लागले आहे. त्या भारतीयांजवळील साधनसामग्री संपत आली आहे.
त्यांच्याजवळील पैसेही संपत आले आहेत. त्यातच त्यांच्या वैद्यकीय विम्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांना एकाचवेळी सामोरे जावे लागत आहे. अशाच 220 भारतीयांनी आपल्या मायदेशात सोशल मीडियावरून संपर्क साधला आहे. त्यांनी सर्वांनी मिळून टोकियोतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आपल्या परतीच्या प्रवासासाठी मदतीची याचना केली आहे.
आपण भारतात पोहोचल्यानंतर स्वतःहून क्वारंटाईन होऊ आणि प्रशासनाला सहकार्य करू, अशी हमी त्यांनी दूतावासाला लिहिलेल्या पत्रामध्ये दिली आहे. जपानमध्ये अंशतः लॉकडाऊन आहे. त्यामुळे या सर्वजणांना तिथे सातत्याने संसर्ग होण्याची भीतीतच रहावे लागते आहे.
होक्काइडो विद्यापीठाचे संशोधन अभ्यासक राहुल जो याच्या कराराचा कालावधी गेल्या महिन्यात समाप्त झाला. त्याने आपल्या गर्भवती पत्नीला भेटण्याच्या ओढीने परतीच्या प्रवासाची तयारीही केली होती. त्याची विमानाची तिकिटेही काढली गेली होती. पण लॉकडाऊनमुळे त्याला मायदेशी परत येता आले नाही.
दोनच दिवसांपूर्वी राहुल याच्या पत्नीची प्रसुती झाली आणि एका गोड कन्येचा जन्म झाला. आपल्या बाळाला भेटता येईल, याचीच त्याला ओढ लागली आहे. कॉन्ट्रॅक्टबरोबरच वैद्यकीय विम्याची मुदतही संपल्याने जर आपल्याला संसर्ग झाला तर उपचार कसे करून घ्यायचे, याची आता त्याला भ्रांत आहे. जपानमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या 11 हजारापेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे विषाणूचा फैलाव आणखी वाढण्यापासून रोखण्यासाठी 16 एप्रिल रोजी आणीबाणीची व्याप्ती संपूर्ण देशपातळीवर करण्यात आली आहे.
मात्र जगभरात अन्यत्र लागू केल्याप्रमाणे जपानमधील लॉकडाऊन सारखी स्थिती नाही. तेथे नागरी हक्कांचे काटेकोरपणे संरक्षण केले जाते, असे राहुल याने सांगितले.
जपानमध्ये सार्वजनिक वाहतुक सुरू आहे. आणीबाणीच्या अंमलबजावणीसाठी विनंत्या आणि सूचनाच केल्या जात आहेत. आपत्कालीन मदत साहित्य आणि वैद्यकीय साधनांच्या पुरवठ्याबाबत आदेशांचे पालन केले नाही, तरच शिक्षा होते. पण तरिही तिथला धोकाही जास्तच आहे. सतत भीतीच्या सावटाखाली रहावे लागते असे राहुल यांनी सांगितले.
कमल विजयवर्गीय केवळ 4 दिवसांसाठी जपानमध्ये गेले पण लॉकडाऊनमध्येच अडकून पडले. गाझियाबादचा रहिवासी अखिलेश शर्मा मार्च महिन्यात एका प्रोजेक्टसाठी टोकियोमध्ये डिसेंबरपासून गेलेला आहे. त्याचा प्रोजेक्ट मार्चमध्येच संपणार होता. तेव्हापासून त्याला आपल्या बचत केलेल्या पैशातूनच खर्च भागवावे लागत आहेत.
अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया चालू आहे, असे भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.