भोपाळ – द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आज निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंगा आश्रम येथे दुपार साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती गेल्या काही काळापासून आजारी होते. अयोध्येतील राम मंदिरासाठी झालेल्या संघर्षात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच स्वातंत्र्य लढ्यातही त्यांना तुरूंगवास भोगावा लागला होता. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्याच्या दिघोरी या गावात 2 सप्टेंबर 1924 रोजी त्यांचा जन्म झाला. पोथीराम उपाध्याय हे त्यांचे नाव. मात्र वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी घर सोडले आणि आपली धार्मिक यात्रा सुरू केली. काशी येथे पोहोचल्यानंतर करपात्री महाराज यांच्याकडून त्यांना वेद आणि शास्त्रांचे शिक्षण मिळाले.
1981 मध्ये झाले शंकराचार्य –
1942 मध्ये जेव्हा इंग्रजांच्या विरोधात चले जाव चा नारा देण्यात आला तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यावेळी उत्तर प्रदेशाती वाराणसी आणि मध्य प्रदेशातील तुरूंगात त्यांना अनुक्रमे 9 आणि 6 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली. करपात्री महाराजांच्या राम राज्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1950 मध्ये ते दंडी संन्यासी झाले आणि 1981 मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी बहाल करण्यात आली.