नवी दिल्ली – करोनामुळे निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीमध्ये 51.6 टक्के लोक मानसिकदृष्ट्या तणावाखाली आहेत. ही धक्कादायक बाब एका राष्ट्रीय ऑनलाइन सर्व्हेद्वारा समोर आली आहे. 15 एप्रिल ते मे दरम्यान केलेल्या ऑनलाइन सर्व्हेत लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. या उत्तरांच्या आधारावर संशोधनकर्त्यांनी असा निष्कर्ष काढला की, 51.6 टक्के लोक मानसिक तणावाखाली आहेत.
साधारण 15 टक्के लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या तणावाखाली होतीच. मात्र, आता करोना आणि लॉकडाऊन काळात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.
हे संशोधन आयसीएमआरच्या प्रोजेक्टसाठी यूनानी चिकित्सा परिषद आणि मौलाना आझाद डेंटल कॉलेजच्या संशोधकांनी केले आहे. हे संशोधन काही लोकांपुरतेच मर्यादित असले तरी यातून निघालेल्या निष्कर्षाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.
मानसिक आरोग्य राखण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. नाहीतर येणाऱ्या काळात मानसिक रुग्णांची संख्या वाढून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.