महाबळेश्वर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केलेल्या गावांची आ. मकरंद पाटील यांनी पाहणी केली. तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मुंबई, नवी मुंबईतून आलेल्या लोकांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते; परंतु प्रशासनाने वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे करोनाची साखळी वेगाने पुढे सरकली नाही; परंतु तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आ. मकरंद पाटील यांनी प्रथम पाचगणीतील सिद्धार्थनगरला भेट दिली. त्यानंतर बेल एअर रुग्णालयाची पाहणी केली.
तेथून जवळच असलेल्या गोळेवाडी गावासही त्यांनी भेट दिली. निसर्ग वादळाच्या प्रभावामुळे महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. पाटील यांनी कासरूड, देवळी, कोट्रोशी, पारूट, हरचंदी, गोरोशी या गावांना भेट दिली. या गावांमध्ये मुंबईकरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची भेट आ. पाटील यांनी घेतली. क्वारंटाइन कक्षातील सोयीसुविधांचा आढावाही त्यांनी घेतला. क्वारंटाइनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर घरी राहायला येणाऱ्या व करोनामुक्त झाल्यावर आपल्या घरी राहायला येणाऱ्यांना चांगली वागणूक द्या. त्यांना बहिष्कृत करू नका. ती आपलीच माणसे असून सध्या अडचणीत आहेत. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे.
माणुसकी जपा, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले. पंचायत समितीच्यावतीने देवळी गावातील गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप आ. पाटील व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका प्रशासनातील करोना योद्ध्यांच्या व ग्राम समित्यांच्या कामगिरीचे आ. पाटील यांनी कौतुक केले. पावसाळ्याच्या प्रारंभी प्रत्येक गावात प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी दिली.